मुंबई – आशिया करंडक स्पर्धेत अखेर विराट कोहलीचे शतक साकार झाले. जितका आनंद त्याला किंवा त्याच्या चाहत्यांना झाला आहे त्यापेक्षाही जास्त आनंद मला झाला, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक व माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र, संघाचा प्रशिक्षक असताना मी त्याच्यासह जवळपास 700 दिवस ड्रेसिंगरूममध्ये घालवले. कोहलीची त्यावेळी असलेली मानसिकता शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे, असा खुलासाही त्यांनी केला.
डगआऊट किंवा ड्रेसिंगरूममध्ये कोहलीला अत्यंत आनंदताही पाहिले आहे व अत्यंत दडपणाखालीही पाहिले आहे. मी अनेकदा त्याच्याशी संवाद साधला व त्याला या निराशाजनक मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, जोवर त्याची मोठी खेळी होणार नाही तोपर्यंत त्याची मानसिकता बदलणार नाही हे मला समजले, असेही शास्त्री यांनी सांगितले.
कोहलीसह संपूर्ण संघाबरोबर मी खूप काळ व्यतित केला आहे. मात्र, माझ्या कार्यकाळातील ते सातशे दिवस जी मी कोहलीची परिस्थिती पाहात होतो ती खूपच भयंकर होती. तो एकटा तासन्तास विचार करत बसायचा. नेटमध्ये त्याचा कसून सराव सुरू होता, तसेच जिममध्येही तो तंदुरुस्ती टिकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत होता. मात्र, हे सगळे त्याला मोठ्या खेळीत प्रत्यक्ष मैदानावर रूपांतरित करताना अपयश येत होते. त्याच्या देहबोलीतून सातत्याने हेच दिसत असे. त्याला मी अनेकदा सल्ला दिला, समजावून सांगितले. तोदेखील सर्व काही शांतपणे ऐकून घ्यायचा. मात्र, त्याच्या वावरण्यात, खेळण्यात मला जे दडपण दिसले ते अन्य कोणत्याही खेळाडूमध्ये दिसले नाही. तो महान आहेच पण त्यालाही या अपयशी कालखंडातून जावे लागले. आता त्याचे शतक झाले त्याचे सर्वात जास्त समाधान आहे, असेही ते म्हणाले.
विश्वकरंडकात जलवा दिसेल
कोहलीची धावांची भूक प्रचंड आहे. तो अथकपणे धावा करण्यात माहीर आहे. आता त्याचे तब्बल तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय शतक झाले व तो मानसिकरीत्याही समाधानी झाला आहे. आता येत्या काळात ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत त्याचा जलवा पाहायला मिळेल. तो महान आहेच पण आता त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला अशाच दडपणाचा सामना करावा लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.