हिमांशू
संकटात असताना दहाजणांना मदत मागितली तर एखादा हात पुढे येतो; पण सल्ला एकाला विचारला तर दहाजण पुढे येतात. फुकटचा सल्ला देणं हा आपल्याकडे लोकांचा आवडता छंद आहे. व्हॉट्सऍपवरसुद्धा सुविचार वगैरे पाठवायची लोकांना किती घाई! तो विचार खरोखर सु-विचार आहे का? आपल्या परिस्थितीत तो लागू आहे का? मुख्य म्हणजे आपण स्वतः त्याचं पालन करतो का? हे प्रश्नही कुणाला पडत नाहीत.
कोविडकाळात तर सल्ला देणाऱ्यांची रीघच लागलीय. एखाद्याला अर्जंट व्हेंटिलेटर बेड हवा असेल किंवा प्लाझ्मा हवा असेल, तर मदतीला येणारे लोक मात्र हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकेच! खरं तर याच लोकांमुळे जग चालतं.
कोविडकाळात शहरा-शहरात मदतीसाठी तयार झालेल्या काही ग्रुप्सचे सदस्य अक्षरशः देवदूतांप्रमाणं काम करतायत. दुसरीकडे फुकटचे सल्ले देणारे मात्र काय खावं आणि काय खाऊ नये, इथंपासून कोविडसाठी दारू चांगली की वाईट, इथंपर्यंत वाट्टेल त्या विषयावर चर्चा घडवून स्वतःची करमणूक करून घेताहेत. या शर्यतीत राजकीय नेते मागे कसे राहतील? इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करायचं, हे सांगायला तज्ज्ञ आहेत की! पण”उपास-तापास न करता अंडी-मटण खा, चिकन खा,’ असा सल्ला देऊन आमदार संजय गायकवाड यांनी वारकऱ्यांचा रोष ओढवून घेतलाच. “काहीही बोला; पण चर्चेत राहा,’ हाच नेत्यांचा फंडा!
तिकडे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीही चॉकलेट खाण्याचा फुकटचा सल्ला देऊन धमाल उडवून दिली. कोविडकाळात लोकांना मानसिक ताण जास्त आलाय. तो कमी करायचा असेल तर डार्क चॉकलेट खाणं चांगलं, असं डॉ. हर्ष वर्धन म्हणाले आणि आहारतज्ज्ञांसह सगळ्यांनीच भुवया उंचावल्या. आहारतज्ज्ञांच्या मते, हा सल्ला हास्यास्पद आहे. डार्क चॉकलेटमध्ये मुळातच जास्त कॅलरीज असतात. साखरेचं प्रमाणसुद्धा जास्त असतं. त्यातून प्रथिनं किती मिळणार, अशी शंका खुद्द आहारतज्ज्ञांनाच आहे. काही तज्ज्ञांना तर ही केवळ बाजारपेठेतली क्लृप्ती वाटते. म्हणजे, डार्क चॉकलेटचा खप वाढवण्यासाठी केलेली “सरकारी जाहिरात’! या डार्क चॉकलेटपेक्षा खजूर किंवा गूळ खाणं अधिक श्रेयस्कर आहे, असं मत या आहारतज्ज्ञांनी मांडलंय.
ही चर्चा एवढी लांबली की, “डार्क चॉकलेट’चं शॉर्टेज निर्माण होईल, अशीही शंका बोलून दाखवली गेली. म्हणजे चॉकलेटचाही काळाबाजार होण्याची चिन्हं! व्हॉट्सऍपवर कुणीही काहीही बोललं तर एकवेळ त्याकडे ठरवून दुर्लक्ष करणं शक्य असतं. परंतु लोकप्रतिनिधीच असे सल्ले देऊ लागले, तर तो “अधिकृत’ मानून त्याचं पालन केलं जाण्याच्या शक्यता वाढणार; परंतु आपल्याकडे अशा धामधुमीच्या, तणावाच्या काळातसुद्धा कुणी तोंड बंद ठेवायला तयार नाही आणि कुणी हात चालवायला तयार नाही.
वस्तुतः अशा सामूहिक संकटाच्या काळात मानसिक ताण का निर्माण होतो, याचं शास्त्रीय विवेचन करायला हवं आणि त्यानुसार उपाययोजना करायला हव्यात. लॉकडाऊनच्या काळात “टेली-कौन्सिलिंग’ करणंही शक्य आहे. काही ठिकाणी असे उपक्रम राबवलेही जाताहेत. परंतु उद्या ऍडमिट करायची वेळ आली, तर बेड मिळेल का? ऑक्सिजन मिळेल का? रेमडेसिविर मिळेल का? व्हेंटिलेटर मिळेल का? ही तणावाची “डार्क’ कारणं आहेत आणि डार्क चॉकलेट हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही!