आसामात फक्त पूरच येतो असं नाही आणि पूर फक्त आसामातच येतो असंही नाही. या वस्तुस्थितीशी आता महाराष्ट्रातील शंभर टक्के नागरिक शंभर टक्के सहमत असतील. आसाममध्ये महापूर आलेला असताना “महाराष्ट्र आसामात’ होता आणि घटनांचा केंद्रबिंदू तिथून महाराष्ट्रात स्थलांतरित होताच “आसाम महाराष्ट्रात’ आला. थोडक्यात सांगायचं झाल्यास, केवळ झाडी आणि डोंगरच नव्हे तर पूरही आसामातून महाराष्ट्रात आला. असो, पूर काही तितकासा महत्त्वाचा नाही. महत्त्वाची आहे पुराची पाहणी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणं.
विठ्ठलाची पूजा जरी एकट्यानं केली, तरी पूरस्थितीची पाहणी करायला दोघांनी एकत्र जायचं असतं, ही गोष्ट महाराष्ट्र शिकला. त्याचप्रमाणं धावत्या गाडीतून अधिकाऱ्यांना सूचना देताना माध्यमांचा कॅमेरा आणि मोबाइलचा स्पीकर फोन “ऑन’असावा लागतो, हेही ज्ञान मिळालं. त्या दृष्टीनं आसाम आपल्यासाठी जाम लकी ठरला. त्या निमित्तानं तिथल्या घडामोडींकडे आमचं किमान लक्ष तरी जाऊ लागलं.
एरवी “देशात कुठे काय चाललंय,’ या प्रश्नात आसाम वगैरे राज्यं अभावानंच असायची. “योग्य जोड्या जुळवा’ हा प्रश्न महाराष्ट्राने आसामात जाऊन सोडवला. त्यामुळे जोड्या जुळवण्यासाठी इथल्या काहीजणांना आसाम खुणावत असल्यास नवल नाही; पण जोड्या कशा टिकवायच्या, याचंही उदाहरण आसामनेच आपल्यासमोर ठेवलंय आणि बुटांची पळवापळवी करण्याच्या भंपक खेळापेक्षाही वेगळं सेन्सेशन लग्नकार्यात असतं, हे दाखवून दिलंय.
शांती आणि मिंटू या आसामातल्या जोडप्यांचं लग्न आणि त्यातल्या त्यात या दोघांनी स्वाक्षरी केलेलं “कॉन्ट्रॅक्ट’ सध्या खूप गाजतंय. शांती आणि मिंटू याचा “शामि’ असा गोंडस शॉर्टफॉर्म शीर्षस्थानी असलेल्या या करारात आठ कलमं दिसतात. काहींना ही कलमं अनावश्यक वाटतील, काहीजणांना अत्यावश्यक वाटतील, काहींना विचित्र वाटतील, तर काहींना गमतीशीर..! काहींना तर प्रश्नही पडतील. उदाहरणार्थ, “रविवारी सकाळचा नाश्ता तू तयार करशील,’ हे कलम नेमकं कुणासाठी असावं? कारण खाली दोघांनीही सह्या केल्यात. त्या तुलनेत “रात्री उशिराच्या पार्ट्यांना परवानगी असेल; पण फक्त माझ्यासोबत,’ हे कलम अधिक स्पष्ट वाटतं.
दोघांनाही ते समान लागू आहे. “प्रत्येक पार्टीत माझा चांगला फोटो काढलाच पाहिजे,’ हे कलम वाचूनसुद्धा “कोण कोणास म्हणाले’ हा प्रश्न पडतोच. “दर पंधरा दिवसांनी शॉपिंगला नेलंच पाहिजे,’ हे मात्र कोणी कोणासाठी म्हटलेलं आहे, हे स्पष्ट समजतं. “घरच्या जेवणाला नेहमी होकार दिलाच पाहिजे,’ या कलमातही स्पष्टता आहे. “पिझ्झा महिन्यातून एकदाच खाता येईल,’ आणि “दररोज जिमला जावंच लागेल’ ही कलमंसुद्धा समानता दर्शवणारी आहेत; पण मग “दररोज साडीच नेसली पाहिजे,’ हे कलम करारात का आहे, समजत नाही!
असो, कलमांमध्ये आणि तपशिलांमध्ये फेरफार करता येईल; पण असा करार जर प्रत्येक लग्नात केलाच तर तो जोडी टिकवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणता येईल. अर्थात, महाराष्ट्राच्या हृदयात आसामविषयी नव्यानं तयार झालेलं स्थान पाहता, राजकीय जोड्या टिकवण्यासाठी असे काही करार करता येतील का? हा प्रश्न अधिक प्रासंगिक ठरेल. आघाड्यांनी असे करार निवडणुकीपूर्वीच करून ते सार्वजनिक केले, तर राजकीय संसार किती सुखाचा होईल ना?