गरिबी हटविता येईल पण सर्वांचे प्रयत्न हवेत
मुंबई, दि. 12 – वीस कलमी कार्यक्रमामुळे देशात नवे वातावरण निर्माण झाले असून शासन, राष्ट्रीयीकृत बॅंका व सर्वसामान्य जनतेने उपलब्ध साधन-संपत्तीचा योग्य उपयोग करून घेतल्यास देशातील गरिबी हटविणे शक्य होईल, असे विदेशमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले.
गरीब महिलांना अर्थसाहाय्य देण्याबाबत बोलताना चव्हाण पुढे म्हणाले की, तसे पाहिले तर भारतात कशाची उणीव नाही. बुद्धिमत्ता, साधन संपत्ती व कौशल्य भरपूर आहे. तरीही देशात विशेषतः खालच्या थरात दारिद्य्र आहे, पण साधनसंपत्तीचा योग्य वापर केला तर ही गरिबी सहज दूर करता येईल.
राजकारणात गुंतण्यास बुद्धिमंतांना बंदी
सिंगापूर – परदेशात वास्तव्य असलेल्या सर्व सिंगापुरी बुद्धिमंतांना राजकारणात भाग घेण्यास बंदी करणारा आदेश सिंगापूर सरकारने काढला आहे. या बंदीतून सिंगापूरच्या पंतप्रधानांचे चिरंजीवांनाही सूट देण्यात आलेली नाही.
सिंगापूर अध्यक्षांची शिष्यवृत्ती मिळवून परदेशात गेलेल्या बुद्धिमंतांनी राजकारणात भाग घेऊ नये आणि सरकारच्या पूर्व संमतीशिवाय आपला शिक्षणक्रमही बदलू नये, असे सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीत म्हटले आहे. बुद्धिमान लोकांनी आपापल्या क्षेत्रातच ठसा उमटवावा, असा पंतप्रधांनाचा संदेश असल्याचे म्हटले आहे.