चेन्नई – तामीळनाडूचे मंत्री व्ही.सेंथिल बालाजी यांच्या अटकेवेळी मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून तामीळनाडू मानवाधिकार आयोगाने सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अहवाल मागवला.
त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे. ईडीने मागील आठवड्यात बालाजी यांना अटक केली. पैशांच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यावरून ती कारवाई करण्यात आली. अटकेनंतर छातीत दुखू लागल्याची तक्रार बालाजी यांनी केली. त्यामुळे त्यांना प्रथम सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून त्यांना खासगी रूग्णालयात हलवण्यात आले. आता त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी होणार आहे.
बालाजी यांना झालेली अटक तामीळनाडूतील आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या द्रमुकला रूचलेली नाही. अशातच बालाजी यांच्या पत्नीने ईडीच्या अधिकाऱ्यांनी मानवाधिकारांचा उल्लंघन केल्याचा आरोप करणारी तक्रार राज्य मानवाधिकार आयोगाकडे नोंदवली. त्या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने ईडीला नोटीस बजावली. अहवाल सादर करण्यास त्या केंद्रीय यंत्रणेला सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत प्रतिसाद न दिल्यास योग्य ती कार्यवाही करण्याचा इशाराही आयोगाने दिला आहे.