नवी दिल्ली– भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत आहे. करोनाचे दु:स्वप्न आता इतिहास जमा झाले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीत तब्बल 4.25 लाख कोटी रुपयांची खरेदी ग्राहकांनी केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
द कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापाऱ्यांच्या संघटनेने या संदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, 13 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे 3.75 लाख कोटी रुपयांच्या वस्तू ग्राहकांनी देशभरात खरेदी केल्या आहेत. अजून गोवर्धन पूजा, भाई दज, तुळशी विवाह, छठ पूजा हे सण राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत आणखी 50 हजार कोटी रुपयांची खरेदी पुढील काही दिवसात होऊ शकेल.
यावर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता गृहीत धरून देशातील व्यापाऱ्यांनी बरीच तयारी केली होती. अपेक्षेप्रमाणे या दिवाळीत छोट्या आणि मोठ्या शहरासह ग्रामीण भागातूनही बरीच खरेदी झाली. आम्ही आतापर्यंत केलेल्या मूल्यांकनानुसार ही खरेदी अपेक्षेप्रमाणे झाली आहे. त्याचबरोबर एकूण ग्राहक वर्गाची मानसिकता आता खरेदी करण्याकडे वळत आहे. त्यामुळे आगामी काळ व्यापाऱ्यासाठी सुखकर राहण्याची शक्यता या संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली.
चीनच्या वस्तूंना कमी मागणी
या संघटनेचे महासंचालक प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, या दिवाळीत चीनच्या एक लाख कोटी रुपयांच्या वस्तूची मागणी कमी झाली असल्याचा आमचा अंदाज आहे. या अगोदर दिवाळीतील एकूण विक्रीपैकी 70 टक्के विक्री ही चिनी वस्तूची होत असे. मात्र केंद्र सरकारने स्वदेशीवर भर देण्याची घोषणा केल्यानंतर आता भारतीय ग्राहक चिनी वस्तूकडे दुर्लक्ष करू लागला आहे. ही समाधानाची बाब आहे. या सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी केवळ व्यापाऱ्यांनीच केली नाही तर ग्राहकांनीही केली आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळीच्या बाजारात चिनी वस्तूची मागणी कमी होती. त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी या वस्तू कमी प्रमाणात उपलब्ध केल्या असे त्यांनी सांगितले.