सातारा – जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने अद्यापही काही तालुक्यात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. माण तालुक्यात 35, खटाव तालुक्यातील 31, वाई तालुक्यातील 30 आणि महाबळेश्वर तालुक्यातील 1 अशा 97 गावांतील भूजल पातळी घटल्याने या तालुक्यांत दुष्काळाचा धोका आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार तर पूर्व भागात कमी अधिक पाऊस पडतो. या 97 गावांत लोकसहभागातून भूगर्भातील पाणी पातळी उंचाविण्यासाठी योग्य तांत्रिक पध्दतीचा वापर गावकऱ्यांनी करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून भविष्यातील प्रश्नाची तीव्रता कमी होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत 97 गावात दर 15 दिवसांनी जाऊन एका विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या टीमकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान गावाच्या हद्दीतील भूगर्भातील पाणी पातळी उंचाविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी प्रकाश बेडसे यांनी व्यक्त केला.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील भूगर्भातील पाणी पातळी खालावलेल्या प्रत्येक गावात भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाकडून अटल भूजल योजनेंतर्गत अभ्यासपूर्ण उपचार पद्धतीचा अवलंब करावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. सध्या याबाबत गावस्तरावर जाऊन तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या 97 गावांनी आता लोकसहभागातून पाणी पातळी उंचावण्यासाठी सर्वोत्तम योगदान देण्याची गरज आहे. याबाबत गावातील नागरिकांना अधिक सक्षम करण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत फेब्रुवारी अखेरपर्यंत दर 15 दिवसांनी 1 प्रशिक्षण दिले जात आहे.
जलसुरक्षा आराखडा तयार
रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये (ता. सातारा) येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्राची टीम ग्रामस्तरावर जाऊन प्रशिक्षण घेत आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात भागीदार संस्था असणाऱ्या श्री मनवेल बारदेस्कर एज्युकेशन सोसायटीच्या तज्ज्ञांची सपोर्ट टीम काम करत आहेत. लोकसहभागातून या 97 गावांचा जलसुरक्षा आराखडा तयार केला असून प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून प्रयत्न केला जात आहे. जलसुरक्षा आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी सध्या सुरू असलेली प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जात असल्याचे प्रकाश बेडसे यांनी सांगितले.