– हेमंत देसाई
गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेला, तर एकाच दिवसात होत्याचे नव्हते होते. म्हणून शेअर बाजारावर नजर ठेवण्यासाठी आता सेबी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापरत आहे, ही स्तुत्य बाब आहे.
2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार येईल आणि देशात स्थिर राजवट असेल, अशी आशा व्यापारी, कारखानदार, आयातदार, निर्यातदार, दलाल आणि देशीविदेशी गुंतवणूकदारांना वाटत आहे. नवनवीन गुंतवणूकदार बाजाराकडे खेचले जात असून, देशातील डीमॅट खात्यांची संख्या 13 कोटीच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. परंतु त्याचवेळी फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. बँक ऑफ इंग्लंडकडून व्याजदर कपातीबाबत सकारात्मक संकेत दिले गेले असून, अनुकूल जागतिक संकेतामुळे भांडवली बाजार उत्साहात आहे, हे खरे आहे.
आर्थिक विकासदरही अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. मार्च महिन्याच्या आत पहिल्या पंधरवड्यात मिड कॅप व स्मॉल कॅप फंडांत डिसेंबर 2022 नंतर सर्वाधिक घसरण अनुभवास आली. या काळात लार्ज कॅप निर्देशांकात तीन टक्क्यांची घसरण झाली असताना, स्मॉल आणि मिड कॅप निर्देशांकांत मात्र अनुक्रमे साडेपाच टक्के आणि 4.56 टक्के इतकी घसरण दिसून आली.
या पार्श्वभूमीवर ‘सेबी’चे पूर्ण वेळ सदस्य कमलेशचंद्र यांनी भांडवली बाजारातील हेराफेरीपासून सावध रहा आणि दलालांवर लक्ष ठेवा, असे आवाहन केले आहे. अडीच वर्ष देशातील गुंतवणूकदारांची संख्या दुपटीने वाढली आहे आणि गेल्या वर्षभरात डीमॅट खात्यांमध्ये 20 टक्क्यांची भर पडली आहे. परंतु गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेला, तर एकाच दिवसात होत्याचे नव्हते होऊन जाते.
शेअर बाजारात सध्या अनेक कंपन्या आयपीओच्या माध्यमातून सूचीबद्ध होत आहेत. आयपीओमध्ये एक मेन किंवा मुख्य बोर्ड आणि दुसरा एसएमई विभागाचा समावेश असतो. एसएमई, म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागातील कंपन्यांच्या किमतीमध्ये गडबडी होत असल्याचे सेबीच्या लक्षात आले आहे. ठोस पुरावे मिळाले की, त्यानुसार सेबी कारवाई करणार आहे.
तसेच एसएमई कंपन्यांच्या आयपीओबाबत अधिक कठोर निकष लागू केले जाणार आहेत, अशी माहिती सेबीच्या अध्यक्ष मधावी पुरी बुच यांनी दिली आहे. 1 मार्च 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या एक वर्षात बेंचमार्क सेन्सेक्समध्ये 22 टक्क्यांची वाढ झाली. परंतु बीएससी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात अनुक्रमे 63 टक्के आणि 65 टक्क्यांची, म्हणजे तिपटीने वाढ झाली. तर बीएससी एसएमई आयपीओ निर्देशांकात 141 टक्क्यांची वृद्धी झाली. शेअर बाजारात ज्या गतीने वाढ होत आहे, त्याच्या आसपासच्या इतक्याच गतीने हे इतर निर्देशांक वाढले असते, तर ते नैसर्गिक म्हणता आले असते.
परंतु ही मिड कॅप आणि एसएमईजमधील तेजी अनैसर्गिक म्हणावी लागेल. ज्या कंपन्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत अधिक पटीने शेअर बाजारात त्यांचा भाव असतो, तेव्हा तो धोका समजायला हवा. याचे कारण, जेव्हा बाजाराची पडझड होते, तेव्हा या अशा कंपन्यांची घसरण त्यापेक्षाही अधिक पटीने होते आणि गुंतवणूकदार अशावेळी संकटात सापडतात. शेअर बाजारात अनेकदा कंपन्या दलालांच्या आणि वित्तसंस्थांच्या मदतीने भावांमध्ये कृत्रिम पद्धतीने वाढ आणि घट घडवत असतात, हा इतिहास आहे. जेव्हा एका मर्यादेपलीकडे भाव वाढतात किंवा घसरतात, तेव्हा सर्किट लावले जाते.
परंतु भावांमधील संशयास्पद गडबड गोंधळावर बारकाईने लक्ष ठेवणे, हे सेबीचे कर्तव्य आहे. आयपीओचा अथवा बाजारात आधीच सूचीबद्ध झालेला शेअर असो, त्याच्या भावांमध्ये कशा पद्धतीने चढ-उतार होत आहेत, त्याचा पॅटर्न काही दिवस अभ्यासून, नंतर सेबी पुरावा गोळा करते. त्या पुराव्याच्या आधारावर केस तयार करून, मग कारवाई केली जाते. काही एसएमईजच्या कंपन्या सूचीबद्ध होताना मॅन्युप्युलेशन झाल्याच्या तक्रारी सेबीकडे आल्या आहेत. छोट्या कंपन्यांच्या भावांत कृत्रिमपणे हेराफेरी करणे हे अधिक सोपे असते. कारण या कंपन्या लहान असतात आणि त्यांचे मार्केटही चिमुकलेच असते. फ्लोटिंग स्टॉक थोडा असतो.
2023 मध्ये 182 एसएमई कंपन्यांचे आयपीओ आले. त्यामधून 4,600 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यात आले. 2022 पेक्षा हे प्रमाण 150 टक्क्यांनी अधिक होते. 2024 मध्ये पहिल्या दोन महिन्यांतच 30 एसएमई कंपन्यांचे आयपीओज येऊन, त्यांनी 1 हजार कोटी रुपये भांडवलाची उभारणी केली आहे. ज्या कंपन्यांचे बाजारमूल्य 5 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असते, त्या स्मॉल कॅप आणि ज्यांचे मूल्य 5 हजार ते 20 हजार कोटी रुपयांच्या कक्षेत असते, त्या मिड कॅप कंपन्या मानल्या जातात.
मागच्या ऑगस्ट 2023 ते जानेवारी 2024 या काळात स्मॉल कॅप फंडांमध्ये 22 हजार कोटी रुपये, तर मिड कॅप फंडामध्ये 13 हजार कोटी रुपये आकर्षित झाले आहेत. ही रक्कम काही छोटी नाही आणि ती लहान लहान गुंतवणूकदारांची आहे. त्यामुळे त्यांचे रक्षण करणे, हे सेबीचे कर्तव्यच आहे आणि सेबी आपले काम चोखपणे बजावेल, अशी अपेक्षा आहे.