लोकशाही राजकारणामध्ये कधीच कोणी कोणाचे कायमस्वरूपी मित्र नसतो किंवा कधीच कोणी कोणाचे कायमस्वरूपी शत्रू नसतो, अशा प्रकारचे विधान नेहमीच वापरले जाते. राजकारणामध्ये हे विधान अनेक वेळा खरेही ठरल्याचे दिसून येते. आता देशामध्ये लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा जे नव्याने मैत्रीचे प्रयोग केले जात आहेत किंवा जुन्या मैत्रीला पूर्णविराम दिला जात आहे ते पाहता पुन्हा एकदा हे विधान प्रकर्षाने समोर येत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या प्रकारचे विविध राजकीय प्रयोग केले जात आहेत त्याचे पडसाद आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमटू लागले आहेत. गेली अनेक वर्षे केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रमुख भाग असलेला रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष खरंतर भाजपाचा जुना मित्रपक्ष आहे.
पण रामदास आठवले गेल्या काही कालावधीपासून नाराज आहेत आणि गुरुवारी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ते आपली आगामी रणनीती जाहीर करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत झालेली बैठक असो किंवा मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठका असोत त्यानंतरच रामदास आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेऊन कोणताही फायदा होणार नाही, असे स्पष्ट विधान त्यांनी केले होते. म्हणजेच राज ठाकरे यांच्यासारख्या नव्या लोकांशी मैत्री करत असताना आमच्यासारख्या जुन्या मित्रांना विसरू नका हेच रामदास आठवले यांनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या नेत्यांना सांगितले होते.
सध्या महायुतीच्या ज्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत त्यामध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला कोठेही स्थान नसल्याने रामदास आठवले आणि त्यांचा पक्ष नाराज झाला असेल तर त्यात चुकीचे काही नाही. नव्या मित्रांचे स्वागत करत असताना जुन्या मित्रांना नाराज करण्याचे हे धोरण गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच राजकीय आघाड्यांमध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आणखी एक मित्र पक्ष महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाजवादी पक्षही नाराज होता आणि शरद पवार यांच्याबाबत त्यांच्या गाठीभेटीही सुरू होत्या. पण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या जुन्या मित्राला आपल्याकडे पुन्हा वळवले असल्याने त्यांची नाराजी जरी दूर झाली.
पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले सदाभाऊ खोतही अजून नाराज आहेत. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणारे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीसुद्धा आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. बीडसारख्या प्रतिष्ठित लोकसभा मतदार संघामध्ये ज्योती मेटे अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात. या निमित्ताने भाजपाचा आणखीन एक जुना मित्र पक्ष नाराज झाल्याचे समोर येत आहे. गेल्या काही कालावधीमध्ये भाजपने महाराष्ट्रामध्ये प्रथम शिवसेनेमध्ये फूट पाडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत मैत्री केली.
त्यानंतरच्या काही कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार यांच्या बरोबरही मैत्री केली. हे दोन मित्र नव्याने जोडत असताना आपल्या जुन्या मित्रांचा मात्र भाजपाला विसर पडला आहे. हीच जाणीव करून देण्याचे काम हे जुने मित्र करत आहेत. रामदास आठवले आणि त्यांचा रिपब्लिकन पक्ष गेली अनेक वर्षे भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. नाही म्हटलं तरी अनेक मतदार संघामध्ये रिपब्लिकन पक्षाला मानणारे कार्यकर्ते युतीचा धर्म पाळून भाजपाच्या उमेदवाराला मतदान करतात हेसुद्धा उघड आहे. तरीही सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्यामध्ये कोठेही रामदास आठवले यांना स्थान नाही.
साहजिकच आता गुरुवारी पुणे येथे होणार्या बैठकीनंतर रामदास आठवले आपली कोणती भूमिका जाहीर करतात हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे ठरणार आहे. एकीकडे विरोधकांची ताकद कमी करण्यासाठी भाजप आपल्या गोटामध्ये मित्रांची संख्या वाढवत असला तरी जागा वाटपामध्ये त्यामुळेच पेचप्रसंग निर्माण होत आहेत, हे भाजपच्या चाणक्यांच्या लक्षात येत नाही. भाजप आणि शिवसेना यांचे सरकार व्यवस्थित चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार यांच्या गटाला सरकारमध्ये सामील करून घेण्याची कोणतीही गरज नव्हती, असे मत एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी भरत गोगावले यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केले असल्याने त्याचाही विचार आता करावा लागणार आहे. अशाच प्रकारची काहीशी नाराजी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीबाबत नक्की काय निर्णय घ्यायचा याबाबत महाविकास आघाडीचे नेते गोंधळात पडले होते. खरेतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबत युती केली होती; पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला प्रकाश आंबेडकर यांच्या पेक्षाही शरद पवार, काँग्रेस यांचीच मैत्री महत्त्वाची वाटत असल्याने त्यांनाही प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबरील जुन्या मैत्रीचा विसर पडला असेल तर तोसुद्धा एक राजकारणाचा भागच आहे. खरे त्याचाच परिणाम म्हणून आता प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
खरेतर सर्वसाधारणपणे कोठेही मैत्री भावना असेल तर कोणतेही गैरसमज नसतात आणि वाद-विवाद नसतात. पण महाराष्ट्रातील राजकारणामध्ये जी नवी आणि जुनी मैत्री समोर येऊ लागली आहे त्यामुळे गोंधळाचे वातावरणच वाढत चालले आहे. एखादा पदार्थ तयार करत असताना त्यात खूप आचार्यांनी डोकं घातलं तर तो पदार्थ बिघडतो, अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. त्या म्हणीचा प्रत्यय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येऊ लागला आहे. एकीकडे नवे आणि जुने मैत्री संबंध जपत असताना राजकारणाची ही रेसिपी बिघडणार नाही याची काळजी घेण्याचे काम सर्वच राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना करावे लागणार आहे. नवे मैत्री संबंध प्रस्थापित करत असताना जुन्या मित्रांकडे झालेले दुर्लक्ष या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांसाठी मतदानाच्या हिशेबात घातक ठरू शकते, याचा विचार आता सर्वांनाच करावा लागणार आहे.