पाकिस्तानात जनतेच्या वाढत्या प्रक्षोभासमोर सत्ताधाऱ्यांची पळताभुई थोडी होईल. वाढती बेकारी व महागाई यामुळे माथी भडकून, अधिकाधिक तरुण दहशतवादाकडे वळण्याची भीती आहे.
पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले असून, हा भारताच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा विजयच आहे. हा प्रस्ताव चीनने सात महिन्यांपासून रोखला होता. परंतु भारत व अमेरिका यांनी मिळून तो मंजूर करवून घेतला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरसारख्या मुद्द्यांवर आपापसात चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश असून, एकमेकांबरोबर शांततेत राहणे जरूरीचे आहे. आम्ही भारतासोबत तीन युद्धे लढलो आणि त्याच्या परिणामी पाकिस्तानमध्ये गरिबी व बेरोजगारीच्या समस्या तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचा धडा शिकलो आहोत, अशी कबुली शाहबाज यांनी दिली आहे. आम्हाला आमच्या लोकांना शिक्षण, आरोग्य सुविधा व नोकऱ्या द्यायच्या आहेत. आम्ही आमची संसाधने बॉंब आणि दारूगोळ्यावर वाया घालवू शकत नाही, असे उद्गार त्यांनी काढले असून, पाकिस्तानला बऱ्याच लवकर ही उपरती झाली म्हणायची! विशेष म्हणजे, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी, भारत हा शक्तिशाली देश आहे आणि अमेरिका व रशिया भारताच्या पाठीशी उभे आहेत, असे मत व्यक्त करून भारताची प्रशंसा केली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेने आपल्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला होता. त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्यानंतर, त्यांनी सातत्याने अमेरिकेविरुद्ध हल्लाबोल सुरू केला आहे; परंतु अमेरिकेशी वैर परवडणारे नाही, असे शाहबाज यांनी म्हटले आहे. चीन, सौदी अरेबिया, कतार त्याचप्रमाणे अमेरिकेनेदेखील संकटकाळी पाकिस्तानला मदत केली आहे, असेही शाहबाज म्हणतात. मात्र, आपल्या विरोधातील पक्षाने अमेरिकेशी संगनमत करूनच सरकार पाडले, असा आरोप इम्रान खान यांनी केला होता. एक प्रकारे शाहबाज यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले असून, पाकिस्तानमध्ये वर्षानुवर्षे अमेरिकेचा थेट हस्तक्षेप होतच असतो. वास्तविक, पाकिस्तान हे अण्वस्त्रसज्ज राष्ट्र असूनही त्या देशाला कटोरा घेऊन सगळीकडे कर्जासाठी हिंडावे लागत आहे. ही उधारउसनवारी करणे अवमानास्पद वाटते, अशी भावनाही शाहबाज यांनी व्यक्त केली आहे. अलीकडेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीस भेट दिली, तेव्हा अमिरातीने एक अब्ज डॉलर्सचे कर्ज पकिस्तानला देऊ केले. विशेष म्हणजे, पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद आसिम मुनीर हेही त्यांच्या समवेत यूएईला गेले होते.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मिफ्ताह इस्माइल यांना अर्थमंत्री करण्यात आले होते. परंतु एका वादामुळे त्यांना जावे लागले आणि त्यांच्या जागी इशाक डार यांना अर्थमंत्री बनवण्यात आले. शाहबाज यांचे ज्येष्ठ बंधू आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे निकटवर्तीय म्हणून डार हे ओळखले जातात. पाकिस्तानच्या डोक्यावर वेगवेगळ्या देशांचे आणि अर्थसंस्थांचे मिळून 100 अब्ज डॉलर्स एवढे कर्ज आहे. 2023 मध्येच त्यांना त्यापैकी 21 अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे आणि पुढच्या तीन वर्षांत उरलेले 70 अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करावे लागेल. आज पाकिस्तानकडे केवळ 4.3 अब्ज डॉलर्स इतकीच विदेश चलनाची गंगाजळी आहे. गेल्या दहा वर्षांतील ही नीचांकी अवस्था आहे. केवळ महिन्याभराची आयातच एवढ्या गंगाजळीत पाकिस्तान करू शकतो.
25 वर्षांपूर्वी पाकिस्तानचा जीडीपी भारताच्या तुलनेत 46 टक्के जास्त होता. तो आता भारतापेक्षा बराच कमी आहे. 2021 साली भारताचा दरडोई जीडीपी 2280 डॉलर्स होता, तर पाकिस्तानचा केवळ 1564 डॉलर्स. मात्र, भारताचा एकूण जीडीपी हा 2020 सालचा विचार करता, 2700 अब्ज डॉलर्स इतका होता, तर पाकिस्तानचा केवळ 203 अब्ज डॉलर्स इतका. भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत पाकिस्तानचा नंबर चोविसावा लागतो. भारतातील केवळ तामिळनाडूचा एकूण जीडीपी जवळपास पाकिस्तानइतका आहे. 1960 ते 2006 या कालावधीत फक्त पाच वर्षे भारत पाकिस्तानपेक्षा अधिक श्रीमंत होता. परंतु 2009 नंतर परिस्थिती खूपच बदलली. 1991 साली भारतात नरसिंह राव व डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरण आणले. त्यानंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भारत सामील झाला. कॉंग्रेसचे सरकार गेल्यावर संयुक्त आघाडी सरकार असो वा वाजपेयी सरकार, त्यांनी उदारीकरणाचा पुरस्कार चालूच ठेवला.
वाजपेयी तसेच डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा शर्थीचा प्रयत्न केला; परंतु पाकिस्तानची वाकडी चाल बदलली नाही. जेव्हा भारतात प्रचंड विदेशी गुंतवणूक येत होती, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा ओघ सुरू होता, तेव्हा पाकिस्तानातून दहशतवाद्यांना निधी व शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू होता. गरज होती, तेव्हा पाकिस्तानला अमेरिकेकडून मदत केली जात होती; परंतु आता पाकिस्तानवर अमेरिकेचे छत्र उरलेले नाही. चीननेही पाकिस्तानचा केवळ आपल्या स्वार्थासाठीच उपयोग करून घेतला आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानातील तालिबानी पाकिस्तानात धुमाकूळ घालत आहेत.
दहशतवादाच्या सापाला पाकिस्तानने दूध पाजले, तो सापच आता पाकिस्तानवर उलटला आहे. पाकिस्तानला आता पाश्चात्त्य देशही मदत करण्यास तयार नाहीत. पाकिस्तानचा शेअर बाजार 1400 अंशांनी कोसळला आहे. पेट्रोल 214 रुपये व डीझेल 169 रुपये लिटर, दूध दीडशे रुपये लिटर, स्वयंपाकाचे तेल 550 रुपये लिटर असे भाव आहेत. आटा दीडशे रुपये किलो, कांदा 220 रुपये किलो आणि पावाचे भाव तर 90 रुपये झाले आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याकडे आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना पगार देण्यासारखीही स्थिती नाही. अशीच जर स्थिती राहिली, तर उद्या लोक रस्त्यावर येतील आणि पाकिस्तानची स्थिती श्रीलंकेसारखी होईल.
भारताचे वाईट चिंतून आणि भारतविरोधी कारवाया करून आपले काहीही भले झाले नाही, उलट भस्मासुर स्वतःवरच उलटला, याचा साक्षात्कार पाकिस्तानला झाला आहे. यातून हा देश सुधारला, तर त्याचे व जगाचे भले होईल.