अकोले, दि. 1 (प्रतिनिधी) -शेंडी-भंडारदरा धम्म यात्रेत खा. हुसेन दलवाई यांना सन्मानित करण्यात आले.
अकोले तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) येथे धम्मयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. धम्म यात्रेचे औचित्य साधून खा. हुसेन दलवाई यांना ‘समताभूषण’ तर अर्जुन डांगळे यांना ‘समाजभूषण’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यावेळी भंडारदऱ्यातील जेतवनात मुलगंधकुटीवर हजारो धम्मयात्री उपस्थित होते. दादासाहेब रूपवते यांच्या स्मरणार्थ या धम्मयात्रेचे आयोजन केले होते.
सकाळी 10 वाजता पंचशिल ध्वजारोहण ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष भीमराज सोनवणे यांच्या हस्ते पार पडल्यानंतर 12 ते 2 या कालावधीमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात संगमनेर येथील सिद्धार्थ विद्यालय, घुलेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे प्रकार सादर केले. दुपारी 3 वाजता मिरवणुकीनंतर धम्मसभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघराज रूपवते हे होते.
दलवाई यांनी समतेचा विचार कायम टिकवला तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल राहील, असे भाकीत केले, तर अर्जुन डांगळे यांनी दादासाहेब रूपवते, प्रेमानंद रूपवते, प्रा. स्नेहजा रूपवते यांच्या आठवणींना उजाळा दिला.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी दादासाहेबांचे कार्य दलित व आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
संघराज रुपवते यांचेही यावेळी भाषण झाले. सुशीलाताई रूपवते, जि. प. सदस्या सुनीताताई भांगरे, उत्कर्षाताई रूपवते, विनय सावंत, एम. डी. सोनवणे, मीनानाथ पांडे, बी. आर. कदम यांच्यासह हजारो धम्मयात्री उपस्थित होते. प्रास्ताविक मिलिंद सोनवणे यांनी केले, तर डी. के. जमधडे यांनी सूत्रसंचलन केले. आभार पोपट सोनवणे यांनी मानले.