जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले असल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती मिळत आहे. इंडोनेशियातील प्रशासनाने याविषयी माहिती दिली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र सियांजूर, पश्चिम जावा येथे 10 किमी खोलीवर होते. तसेच, यामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचंही प्रशासनाने स्पष्ट केले. भूकंपामुळे आतापर्यंत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल 300 लोक गंभीर रित्या जखमी झाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जकार्तामध्ये भूकंपानंतर लोक घाबरले. त्यांच्या कार्यालयात काम करणारे लोकही बाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारत हादरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, याआधी शुक्रवारी रात्री पश्चिम इंडोनेशियामध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. यावेळी कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) भूकंपाची तीव्रता 6.9 इतकी नोंदवली होती. त्याचा केंद्रबिंदू दक्षिण बेंगकुलूपासून 202 किमी नैऋत्येस 25 किमी खोलीवर होता. यानंतर दुसरा धक्का बसला, ज्याची तीव्रता 5.4 होती.