नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत महायुतीमध्ये अद्यापही पेच कायम आहे. नाशिकच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. यातच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याऐवजी मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटणार आणि कोणत्या पक्षाकडे ही जागा जाणार? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी सूचक विधान केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले, जोपर्यंत अधिकृतरित्या जाहीर होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी उमेदवाराचे नाव जाहीर होईल, त्यावेळी आम्ही सगळे एकत्रित काम करणार आहोत. नाशिकची निवडणूक महाराष्ट्रातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आहे.
त्यामुळे इतर ठिकाणी तेथील वाटाघाटी झाल्या आहेत. काही निवडणुका दोन दिवसांत आहेत. तसेच काहींचे दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरायचे सुरु आहे. त्यामुळे तेथील वाटाघाटी आणि निवडणुकीसाठी सगळ्यांचे लक्ष आहे, असे भुजबळ म्हणाले.
भाजपने जाहीरनाम्यात काही सांगितले असेल तर ते पूर्णदेखील करतील. अनेक गोष्टींची पूर्तता त्यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांना सुद्धा दरवर्षी ठराविक रक्कम पीएम किसान योजेनेतून खात्यात जाते.
घरांच्या योजनेसाठी १२ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत. यानंतर राज्य सरकारनेही अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत. महायुतीचा फायदा हा भारतातील जनतेला होत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.