मुंबई – दसऱ्यानिमित्त उद्या मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. त्याकरिता शिवसेनेचा उध्दव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांनी जोरात तयारी केली असून या मेळाव्यांकडे शक्ती प्रदर्शन म्हणूनच पाहिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत गर्दी होणार असली तरी कोणी चुकीचे करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ठाण्यात टेंभी नाका येथे देवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मोठ्या प्रमाणात जरी लोक येणार असले तरी त्याची आम्हाला काळजी नाही. कायदा आणि सुव्यवस्था आम्ही नीट ठेवू. या गर्दीचा फायदा घेत कोणी चुकीचे काम करणार नाही याचीही खबरदारी आमच्याकडे घेतली जाईल.