नगर – जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणे भरली असली तरी उर्वरित जिल्हा मात्र अद्यापही कोरडा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 65.42 टक्के पावसाची नोंद झाली. त्यापैकी 30 टक्के पाऊस हा अकोले तालुक्यात झाला आहे. समाधानकारक अद्यापही न झाल्याने जिल्ह्यात अजूनही तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
पावसाअभावी उद्भव कोरडे पडले असून जिल्ह्यात तब्बल 542 स्वतंत्र पाणीयोजनांनी माना टाकल्या आहेत. पाणीयोजना बंद पडल्याने या सर्व गावांना टॅंकरशिवाय पर्याय राहिला नाही. परंतु ऑगस्ट महिना लोटला तरी टॅंकर चालू असल्याने त्यातून काही गैरव्यवहार होण्याच्या भितीने प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून दडपशाहीचा वापर करून टॅंकर बंद केले जात आहे.
त्यामुळे या ग्रामस्थांना भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावात येणारे टॅंकर अचानक बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत असतांना लोकप्रतिनिधी मात्र गप्प बसल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात 352 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर 542 स्वतंत्र पाणीयोजना बंद आहेत. म्हणजे 190 टॅंकरची तफावत दिसून येत आहे. त्याचा विचार होत नसल्याचे दिसत आहे.
पावसाअभावी दक्षिणेतील सर्वच तालुक्यांमध्ये पाणीटंचाई आजही कायम आहे. उत्तरेत कोपरगाव, राहाता, नेवासे तालुक्यात आता पाणीटंचाईची झळ बसली आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम आता हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिके तर वाया गेलीच आहे. पण पिण्याच्या पाण्यासाठी देखील भंटकती करावी लागत आहे. पावसामुळे जिल्ह्यात उद्भव कोरडे पडले असून 542 स्वतंत्र पाणीयोजना बंद पडल्या आहेत.
तालुकानिहाय योजना व बंद पडलेल्या योजना कंसात ः अकोले- 157 (2), संगमनेर- 183 (10), कोपरगाव- 84 (2), राहाता- 55 (3), राहुरी- 55 (6), श्रीरामपूर- 85 (2), नेवासे- 51 (33), शेवगाव- 31 (7), पाथर्डी- 104 (61), नगर- 75 (52), पारनेर- 169 (91), श्रीगोंदा- 145 (75), कर्जत- 120 (96), जामखेड- 106 (102).
मे महिन्याच्या तुलनेत 94 योजना सुरू
मे महिन्यात जिल्ह्यातील 636 पाणीयोजना बंद पडल्या होत्या. त्यानंतर जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसानंतर केवळ 94 योजना सुरु झाल्या आहेत. मात्र उर्वरित 542 पाणीयोजना अद्यापही बंद पडलेल्याच आहेत. अजूनही काही दिवसांत पावसाने ताणले तर यात बंद पडणाऱ्या पाणीयोजनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
मे महिन्याच्या तुलनेत 94 योजना सुरू
मे महिन्यात जिल्ह्यातील 636 पाणीयोजना बंद पडल्या होत्या. त्यानंतर जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसानंतर केवळ 94 योजना सुरु झाल्या आहेत. मात्र उर्वरित 542 पाणीयोजना अद्यापही बंद पडलेल्याच आहेत. अजूनही काही दिवसांत पावसाने ताणले तर यात बंद पडणाऱ्या पाणीयोजनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.