नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. कुठल्याही मार्गाने पाकिस्तान भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा निषेध आता कॉंग्रेसने व्यक्त केला आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. काश्मीरमध्ये जो हिंसाचार होत आहे, त्याला पाकिस्तानचा पाठिंबा, असल्याचे म्हणत त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.
केंद्र सरकारच्या कलम 370 ला कॉंग्रेसने जरी विरोध केला असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र भारताचा बाजू घेत पाकिस्तानला धारेवर धरले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून पाकिस्तानवर हल्लाबोल केला. विद्यमान सरकारबरोबर आपण अनेक मुद्द्यांवर असहमत आहोत. परंतु काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, हे मी स्पष्ट करत आहे. या प्रकरणात पाकिस्तान किंवा अन्य कोणत्याही देशाने हस्तक्षेप करून नये, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. जम्मू काश्मीरमध्ये जो हिंसाचार परसत आहे, त्याला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. संपूर्ण जगभरात दहशतवादाला पाकिस्तानने पोसले असल्याचेही ते म्हणाले.