बंगळुरू :- कर्णधार हनुमा विहारीने फटकावलेल्या जिद्दी अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण विभागाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत पश्चिम विभागाविरुद्ध आपल्या पहिल्या डावात 7 गडी गमावून 182 धावांपर्यंत मजल मारली. या लढतीत पावसाने व्यत्यय आणल्याने दिवसातील पूर्ण षटकांचा खेळ होऊ शकला नाही.
पश्चिम विभागाचा कर्णधार प्रियांक पांचाळने नाणेफेक जिंकत दक्षिण विभागाला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर रवीकुमार समर्थने साफ निराशा केली. मात्र, त्यानंतर मयंक आग्रवाल व तिलक वर्मा या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
आग्रवाल स्थिरावलेला असताना 28 धावांवर परतला. त्यानंतर वर्माही धावांच्या चाळीशीत बाद झाला. त्याचवेळी कर्णधार विहारीने एएका बाजूने भक्कमपणे फलंदाजी केली. त्याने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. मात्र, त्याला समोरून म्हणावी तशी साथ लाभली नाही. निराश झालेला विहारीही बेजबाबदार पद्धतीने फटका मारून 63 धावांवर बाद झाला.
रिकी भुई, सचिन बॉबी व रवीश्रीनिवासन साई किशोर यांनीही निराशा केली. त्यावेळी वॉशिंग्टन सुंदर 9 व विजयकुमार वैशाख 5 धावांवर खेळपट्टीवर होते. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली व खेळ थांबवावा लागला.
पाऊस थांबल्यावरही अंधुक प्रकाशामुळे पुढे खेळ होऊ शकणार नाही असे पंचांनी जाहीर केले व पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. पश्चिम विभागाकडून शम्स मुलाणी, चिंतन गाजा व अर्जन नागवासवाला यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.