नवी दिल्ली – केंद्रात यूपीएची सत्ता असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांना कृषी क्षेत्रात सुधारणा करावयाच्या होत्या. मात्र, त्यांना राजकीय दबावामुळे तसे करणे शक्य झाले नाही, असा दावा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सोमवारी केला.
महाराष्ट्र कृषक समाज आणि इतर 10 शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तोमर यांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलताना तोमर यांनी मनमोहन आणि पवार यांचा उल्लेख केला. मात्र, त्यांच्यावरील राजकीय दबावाचा अधिक तपशील त्यांनी उघड केला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुधारणांसाठी सकारात्मक पाऊले उचलत आहे. मात्र, काही घटक त्यांना विरोध करत आहे. खरेतर, सरकारच्या सुधारणांमुळे देशाचे चित्र बदलणार आहे.
गरीब आणि शेतकऱ्यांचे नुकसान करणारा कुठलाच निर्णय मोदी सरकार घेणार नाही, अशी ग्वाहीही तोमर यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत सुमारे दोन डझन शेतकरी संघटनांनी वादग्रस्त ठरलेल्या कृषी कायद्यांना पाठिंबा दर्शवला आहे.