विशाल वर्पे
केंदूर – करोना महामारीचा घाव सर्वच क्षेत्रातील अर्थकारणावर बसला आहे. करोनामुळे सध्या राज्यातील सर्व मंदिरे, चर्च, विहारे तसेच सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. लग्नसमारंभ, वाढदिवस तसेच इतर कार्यक्रमांवरही बंदी आहे. यामुळे केंदूर (ता. शिरूर) परिसरातील फूल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या झेंडूला पाच रुपये किलो बाजारभाव मिळत आहे. यामुळे फुले शेतातच गाडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
गणेशोत्सवामध्ये झेंडूच्या फूलाला चांगला बाजारभाव मिळाला मात्र बाजारभाव असताना उत्पादन कमी होते. आत्ता उत्पन्न वाढले तर बाजारभाव ढासळले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून लग्न समारंभ, वाढदिवस, छोटे मोठे कार्यक्रम त्याचबरोबर मंदिरे देखील बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या फुलाची मागणी कमी झाली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या झेंडूच्या फुलाला सद्या अवघा पाच रुपये किलो बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. एक एकरात वीस हजार रुपयांची सुमारे सहा हजार रोप, ठिबक सिंचन, खते, औषधे असा एक एकरसाठी तब्बल सत्तर हजार रुपये खर्च होतो. मात्र सध्या बाजारभाव नसल्यामुळे तोडणीचा देखील खर्च वसूल होत नाही. दोन महिन्यात तोडणीला आलेली फुले उघड्या डोळ्यांनी सडताना शेतकऱ्यांना पहावी लागत आहेत.
कुटुंबाच्या मदतीने एक एकरमध्ये झेंडूची बाग उभी केली. मात्र फुले तोडणीला आली आणि बाजारभाव उतरला. त्यामुळे तोडणीचा खर्च देखील वसूल होत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
– प्रकाश दरेकर, फुल उत्पादक शेतकरी, करंदी