बारामती -बारामतीत प्रशासनाने 14 दिवसांच्या जनता कर्फ्यूची अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानुसार आता पुढील सात दिवसही जनता कर्फ्यू लागू असणार आहे. त्यामुळे 21 सप्टेंबरनंतरच बारामतीतील व्यवहार सुरू होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज सायंकाळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
बारामतीमध्ये करोना रुग्णांचा आकडा सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून वाढत राहिला आहे. सामूहिक संसर्गाचा वेग जोरात सुरू झाला असून करोनाचा गुणाकार सध्या सुरू आहे. मार्च ते ऑगस्ट अखेरपर्यंत बारामती व तालुक्यात सर्व मिळून 1 हजार रुग्ण आढळले, तर 2 सप्टेंबरपासून 13 सप्टेंबरपर्यंत एक हजार रुग्ण आढळले. रुग्णांची संख्या 100च्या वर जाऊ लागताच बारामतीत जनता कर्फ्यू लागू करण्याच्या मागणीस जोर आला. त्यानंतर दररोज 100हून अधिक रुग्ण दिसू लागले.
अजूनही दररोज 80पेक्षा अधिक करोनाग्रस्त आढळत आहेत. ही संख्याही काही कमी नाही. जनता कर्फ्यू लागू केल्यानंतर मात्र सुरवातीच्या वेगात फरक पडला आहे. शहरातील रुग्णांच्या संख्येतही घट दिसू लागली आहे. त्यामुळे हा वेग आणखी नियंत्रणात आणण्यासाठी अजूनही वेळ हवा आहे. अन्यथा करोनाचा गुणाकार कायम राहिला तर बारामती तालुका पाच हजारांचा आकडा याच महिन्यातही गाठेल, अशी भीती काही जणांनी व्यक्त केली आहे.
शहरातील प्रत्येकाची होणार तपासणी
करोना रुग्णांचे प्रमाण कमी होण्यास सुरूवात झाल्यामुळे आणखी काही दिवस जनता कर्फ्यू लागू राहिल्यास ही साखळी तुटणार आहे. त्यामुळेच आता पुढील सातही दिवस बारामती शहर आणि तालुक्यात जनता कर्फ्यू लागू राहणार आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसांत बारामती शहर आणि तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून करोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.