पुणे – सांगली जिल्ह्यातील कराड, मलकापूर भागातून आणि कर्नाटक येथील बेळगाव भागातून मार्केट यार्डात रताळांची आवक सुरू झाली आहे. यावर्षी दुष्काळाचा फटका रताळीच्या पिकाला बसला आहे. उत्पादन घटल्यामुळे नेहमीच्या तुलनेत 75 टक्केच आवक झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 10 टक्के भाव जास्त मिळत असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.
घुले म्हणाले, नवरात्रात नऊ दिवस उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या काळात उपवासासाठी रताळीला जास्त मागणी असते. राज्यातील कराड, मलकापूर भागातून आलेली रताळी गोड, चवदार, आकाराने लहान आणि दिसायला आकर्षक असतात. त्यामुळे ती ग्राहकांच्या पसंतीस पडतात. त्यामुळे त्यांना बेळगाव रताळींपेक्षा जास्त भाव मिळतो. त्या रताळांना घाऊक बाजारात प्रती किलोस 35 ते 40 रुपये भाव मिळत आहे. तर, कर्नाटक रताळी आकाराने मोठी असतात. ती चवीला थोडीशी तुरट असतात. त्यामुळे त्यांना राज्यातील रताळींपेक्षा तुलनेने कमी 25 ते 30 रुपये भाव मिळत आहे. पुढील काही दिवस आवक सुरूच राहणार आहे.