दुष्काळी दौरा नाही, पण दुष्काळाची आढावा बैठकही नाही
नगर: जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईने भीषण रुप धारण केले आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण सुरू आहे, रोजगार हमीची कामे संथगतीने सुरू आहेत, अशी गंभीर स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली असतांना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना मात्र दुष्काळाचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. दुष्काळी दौरा तर सोडा पण दुष्काळाची आढावा बैठक घेण्याची तसदी देखील ना. शिंदे यांनी अजून दाखविली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेत आहे. पण ना.शिंदे यांना तेवढाही वेळ नसल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेवून सर्वच पालकमंत्र्यांना दुष्काळाची आढावा बैठक घेवून दुष्काळी तालुक्यांचे दौरे करण्याचे आदेश दिले होते. त्याबरोबर निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी देखील केली होती. त्यानुसार आयोगाने आचारसंहिता शिथिल करून मंत्र्यांना दुष्काळी दौरे करण्याची परवानगी दिली. अर्थात शेजारच्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी दुष्काळी दौरे सुरू केले आहे.अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा बैठका देखील घेतल्या आहेत. परंतू जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आदेश देवून आज दहा दिवस झाले तरी दौरा नाही पण बैठक देखील न घेवून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.
जिल्ह्यात सध्या 12 लाख लोकांना 772 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याचे उद्भव कोरडे पडत असल्याने टॅंकरच्या मागणी वाढ होत आहे. दररोज आठ ते दहा प्रस्ताव येत आहे. छावण्याची संख्या देखील वाढत आहे.जिल्ह्यात 7 तालुक्यात 493 चारा छावण्या उभारण्यात आल्या असून यामध्ये 2 लाख 67 हजार 574 मोठी तर 41 हजार 917 लहान अशी मिळून 3 लाख 9 हजार 491 जनावरे दाखल दाखल झाली आहेत. या छावणीचालकांना पाणी व चारा विकत घ्यावा लागत आहे. या छावणी चालकांच्या अनेक अडचणी आहेत. तशाच शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत.
प्रशासकीयस्तरावर टंचाईवर उपाययोजना करण्यात येत आहे. परंतू अधिकारी आपल्या पद्धतीने मनमानी कारभारी करीत असल्याने अनेक अडचणी उभ्या राहत आहे. अर्थात दररोजच्या पिण्याच्या पाण्याची भ्रांत पडली असल्याने त्यांना आपले दुखणे मांडायला देखील वेळ नाही. याचा फायदा घेवून अधिकारी आपल्या परीने टंचाईच्या उपाययोजना राबवित आहे. छावणी वाटपात झालेली वशिलेबाजी, टॅंकर सुरू करतांना होणार दिरंगाई याकडे कोणाचे लक्ष नाही.
दुष्काळात सरकार सर्वसामन्यांबरोबर आहे असे मुख्यमंत्री सांगत असतांना पालकमंत्री मात्र जिल्ह्याच्या बाहेर खासगी कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. त्यांना जिल्ह्यातील दुष्काळाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकचे आदेश दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी नाही पण नाशिक विभागीय आयुक्तांनी दुसऱ्या दिवशी तातडीने दुष्काळासह खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा बैठक घेतली. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी ऑडियो ब्रीजच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकारी व 53 सरपंचाबरोबर चर्चा केली. जिल्ह्यातील दुष्काळी आढावा बैठक घेवून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले. अर्थात मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीपूर्वी पालकमंत्र्यांची आढावा बैठक होणे अपेक्षित होते. परंतू ती बैठक पालकमंत्र्यांना घेता आली नाही.
पालकमंत्री सत्तेची मस्तीत आहेत. त्यांना लोकांचे देणेघेणे नाही. जिल्हास्तरावर नाही तर प्रत्येक तालुक्यात त्यांनी बैठक घ्यायला हवी. गावपातळीवर गेल्यानंतर लोकांच्या व्यथा कळतील. आज छावण्यांमध्ये जनावरांना दहा किलो चारा दिली जात असून हिरवा चारा तर पाहिला मिळत नाही. अर्थात छावणीचालकांना गेल्या अडीच महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. ते तरी पैसा कोठून आणणार. सरकारने अनुदान वेळत न दिल्याने आज जनावरांवर उपासमारीचे वेळ आली आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जामखेड शहरात पाण्यावरून दोन गटात मारामारी होत आहे. पालकमंत्री काय करता हे यावरून दिसून येते. आज रोहित पवार यांच्या माध्यमातून 80 टॅंकरने जामखेड व कर्जतमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. कोरडा पडलेल्या भुतवडा तलावातील गाळ काढण्यासाठी पॉकलेन देण्यात आले आहे. हे काम पालकमंत्र्यांनी सत्तेच्या माध्यमातून करायला हवे.ती कामे आज पवार करीत आहेत.
-राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
पालकमंत्री दुष्काळाबाबत गंभीर आहेत. कर्जत, जामखेड, नगर तालुक्यातील छावण्यांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुष्काळाबाबत केलेल्या सुचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाच्या सांगितल्या असून त्यांची अंमलबजावणी होत आहे. प्रशासन योग्य पद्धतीने दुष्काळी उपाययोजना राबवित असल्याने जिल्ह्यात कोठेही ओरड नाही. पालकमंत्री सातत्याने या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने जिल्ह्यात योग्य पद्धतीने प्रशासन काम करीत आहे.
-भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष, भाजप