डॉ. विखेंचे मताधिक्य वाढल्याने युतीत आनंद
शशिकांत भालेकर
पारनेर – लोकसभा 2014 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फटका नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाला बसला होता. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत मोदी लाट ओसरली असं वाटत असताना एक दुसरी सुप्त लाट तयार झाली होती. आणि ती लाट निर्णायक ठरली. डॉ. विखे यांना तालुक्यातून मतांची मोठी आघाडी मिळाल्याने राष्ट्रवादीच्या उच्छुकांमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
लोकसभेसाठी डॉ. सुजय विखे विरुद्ध आ. संग्राम जगताप अशी लढत असली, तरी पारनेरमधून अनेकांची अस्तित्व या लोकसभेच्या निवडणुकीत अवलंबून होते. त्यावरच विधानसभेचे गणित अवलंबून असल्यामुळे याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते. नीलेश लंके यांनी लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशावेळी त्यांना आमदारकीच्या तिकिटाचे आश्वासन मिळाले असेल. परंतु त्यांचा लोकसभा निवडणूक आधीचा प्रवेश हा त्यांच्यासाठी सध्यातरी घातक ठरत असल्याचं चित्र निर्माण झाले आहे. लंके यांनी सव्वा वर्षापूर्वी आमदार विजय औटी यांच्या विरोधात बंड पुकारले व आपले स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केले. हे करत असताना त्यांनी आपली ताकद तालुक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे कार्य वर्षभर उजळत होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये केलेला प्रवेश हा अनेक जाणकारांच्या मते चुकीचा ठरला असून, त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान प्रतिष्ठानच्या मार्फत अलिप्त भूमिका घेणं गरजेचं होतं. त्यांचे एकगठ्ठा मताधिक्य कोणा एका उमेदवाराच्या पाठीशी त्यांना देता आले असते. त्याचा फायदा त्यांना विधानसभेमध्ये करता आला असता. पण राष्ट्रवादीमध्ये आधीच डझनभर पुढारी असताना लंके यांच्या प्रवेशाने त्यात वाढ झाली व लंके यांना त्यांची ताकद राष्ट्रवादीमध्ये सिद्ध करता आली नाही. त्याचा परिणाम लंके यांना विधानसभेच्या आमदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल व तिकीट मिळाल्यानंतर देखील लढाई सोपी नाही, असे चित्र लोकसभा निवडणुकीनंतर दिसत आहे.
लंके यांना शिवसेनेतून काढल्यानंतर त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. विधानसभेमध्ये प्रबळ दावेदार विद्यमान आमदार विजयराव औटी यांना कडवे आव्हान निर्माण होत होते, असे एक वर्षापासून चित्र निर्माण झाले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी केलेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश हा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला. राष्ट्रवादीमध्ये पक्ष स्थापनेपासून असणारे सुजित झावरे हे अनेक वर्षे पक्षाचे तालुकास्तरीय सर्वेसर्वा राहिले आहेत.
माजी आमदार वसंतराव झावरे यांनी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी वाढवण्यासाठी मदत केली. त्यानंतर सुजित यांची देखील पक्ष वाढवण्यासाठी मदत झाली. परंतु अलीकडच्या काळामध्ये तालुक्यातील पक्षातील काहींनी सुजित झावरे यांना विरोध सुरू केला. त्यांचेच निष्ठावंत कार्यकर्ते यांनी विरोध करून लंके यांना पुढे केले. परंतु लोकसभेमध्ये त्याचा परिणाम जाणवला. लंके यांच्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद वाढेल, असे वाटत होते. परंतु लोकसभेच्या निकालानंतर मात्र लंके असून देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आघाडी मिळवता आली नाही.
तालुक्यामध्ये विखे परिवारास मानणारा मोठा वर्ग आहे. माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे यांनी त्यांच्या काळामध्ये मोठी फळी तालुक्यांमध्ये निर्माण केलेली आहे. या फळीचा परिणाम वेळोवेळी विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला दिसतो आहे. प्रवरेचा आदेश जसा असेल, त्या दिशेने त्या पक्षाचा आमदार तालुक्यामध्ये होत आहे. पंधरा वर्षांपासून आमदार औटी यांना विखे गटाचा फायदा मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये औटी यांनी विखे यांना केलेल्या मदतीमुळे विधानसभेमध्ये देखील विखे-औटी यांचे काम करतील व त्याचा फायदा विधानसभेमध्ये औटी यांनाच होईल.
लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ. सुजय विखे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ही निवडणूक सोपी नव्हती. परंतु त्यांची असणारी प्रवरेची यंत्रणा प्रत्येक घरोघरी पोचली. त्यांनी तीन वर्षांपूर्वी तयारी सुरू केली होती. त्याचा फायदा त्यांना लोकसभेच्या निकालानंतर दिसला. आ. जगताप यांना निवडणुकीआधी तिकीट देण्यात आले. जगताप यांनी देखील कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीची लढत दिली.
तालुक्यातील कॉंग्रेस विखे यांना मानणारी असल्यामुळे डॉ. विखे यांनी ज्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला, त्या दिवशी कॉंग्रेसमधील सभापती राहुल झावरे, राहुल शिंदे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे, सचिन वराळ, जि. प. सदस्य पुष्पाताई वराळ आदींनी विखे हेच आपला पक्ष असल्याचे सांगत त्यांच्याबरोबर प्रचारामध्ये सहभागी घेतला. त्यामुळे तालुक्यामध्ये भाजप शिवसेना कॉंग्रेस अशा प्रकारची युती झाल्याचे चित्र पारनेर तालुक्यात होते.
तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये अनेक नेत्यांची फौज निवडणुकांमध्ये कुचकामी असल्याचे सिद्ध झाले. तालुक्यात अनेक महारथी असताना पक्षाची झालेली पीछेहाट ही चिंतेची बाब आहे.
तालुक्यामधील राष्ट्रवादीमध्ये असणारे प्रमुख नेत्यांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, नवीन प्रवेश केलेले नीलेश लंके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, औद्योगिक महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, माजी सभापती मधुकर उचाळे यांसारखे अनेक महारथी पक्षांमध्ये असताना देखील पक्षाची झालेली पीछेहाट ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी असलेली इच्छुकांची बिघाडी झाली आहे.