पुणे –“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाप्रतीचे योगदान आम्ही देशासमोर ठेवणार आहोत. पंतप्रधान मोदी हे भारताच्या संविधानाच्या मार्गदर्शनानेच देश चालवत आहेत.
डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनाशी निगडीत पाचही स्थानांना स्मृतिस्थानात बदलण्याचा आणि “संविधान दिवस’ साजरा करण्याचा निर्णयही भाजप सरकारनेच घेतला,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले.
पुणे महापालिका आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन आणि महापालिकेमध्ये बसवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार प्रकाश जावडेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, उपमहापौर सुनीता वाडेकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर, रिपाइं नेते परशुराम वाडेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी यावेळी उपस्थित होते.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जीवनात आणि त्यानंतरही अपमानित करण्याची एकही संधी कॉंग्रेसने सोडली नाही. त्यांना भारतरत्न तेव्हाच मिळाले जेव्हा कॉंग्रेसची सत्ता देशात नव्हती,’ अशी टीका शहा यांनी यावेळी केली.
“महापालिकेत स्थापलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही कायम तरुणांचे प्रेरणास्थान राहील. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी शिवाजी महाराजांनी शिकस्तीचे प्रयत्न केले. न्याय, समाजकल्याण आणि आत्मरक्षणासाठी व्यूहरचना केली, सैन्याचे आधुनिकीकरण केले. केवळ त्यांच्या जीवनाच्याच कार्यकाळात नव्हे तर त्यानंतरही स्वराज्याचे हे आंदोलन सुरूच राहिले,’ असे शहा यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. केंद्रीयमंत्री आठवले यांनी त्यांच्या खास कवितेच्या शैलीत भाषण केले. उपमहापौर वाडेकर यांनी आभार मानले.