कॉंग्रेसची भूमिका
मुंबई,:- राज्यात महायुतीचेच सरकार येणार असा ठाम दावा भाजप नेते करीत असले तरी भाजपच्या सत्ता स्थापनेला कॉंग्रेसचा विरोध आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपमुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपाचे सरकार नको, अशी भूमिका कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडली.
शिवसेना आणि भाजपात सत्ता स्थापनेवरून तिढा निर्माण झाला असतानाच सरकार स्थापन करण्यास होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसची आज महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सरकारी निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, हुसेन दलवाई, अमित देशमुख, विश्वजित कदम आदी नेते उपस्थित होते.
अशोक चव्हाण म्हणाले, जनतेचा कौल भाजप किंवा इतर पक्षांना नाही. त्यामुळे भाजपचे सरकार येऊ नये असे कॉंग्रेसचे मत आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन निर्णय घेत नाही तोपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होणार नाही, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. तर राज्यात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये अशी कॉंग्रेसच्या नव्वद टक्के आमदारांची इच्छा आहे. याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करत आहोत असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
…तर कॉंग्रेस वेगळा गट स्थापन करणार
भाजपा राज्याच्या सत्तेवर नको, अशी कॉग्रेसच्या एका गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास आपण बाहेरून पाठिंबा देऊ अशी कॉंग्रेस आमदारांची मागणी आहे. दिल्लीत बसणा-या पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रातील राजकिय परिस्थितीचा अंदाज नाही. त्यादृष्टीने कॉंग्रेसच्या एका गटाचा मोठा दबाव कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींवर आहे. मात्र, नवी दिल्लीतल्या नेतृत्वाने बाहेरून पाठिंबा देण्यास नकार दिला तर आपण वेगळा गट स्थापन करून बाहेरून पाठिंबा देऊ, असे कॉंग्रेसमधील एका गटाचे मत असल्याचे सांगण्यात येते.