रामदास आठवले यांचा शिवसेनेला इशारा
नवी दिल्ली – शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा तिढा 14 दिवसांपासून सुटलेला नाही. भाजपकडून शिवसेनेच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत चर्चादेखील करायला तयार नाही. अशा परिस्थितीत शिवसेना भाजपसोबत युती तोडेल, असे बोलले जात आहे. यासंबंधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, आमच्याकडे (शिवसेना सोडून भाजप आणि मित्रपक्षांकडे) सध्या 120 आमदारांचे संख्याबळ आहे. शिवसेना आमच्या सोबत आली नाही तर आम्ही 120 आमदारांच्या संख्याबळावर अल्पमतातलं सरकार स्थापन करु. त्यासाठी 25 आमदारांचा पाठिंबादेखील मिळवू. हे अल्पमतातलं सरकार आम्ही पाच वर्षे चालवून दाखवू, अशा शब्दात आठवले यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.
शिवसेनेने त्यांची आडमुठेपणाची भूमिका सोडत मुख्यमंत्रीपदाची मागणी करणे थांबविले पाहिजे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडून द्यावा आणि उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घ्यावे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तास्थापनेबाबत 50-50चा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. परंतु 50-50 चा फॉर्म्युला म्हणजेच एका पक्षाला मुख्यमंत्रीपद आणि दुसऱ्याला उपमुख्यमंत्रीपद असा होतो, असेही ते म्हणाले.
तसेच राज्यातल्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. महायुतीसाठी मतदान केले आहे. त्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी राज्यातील जनतेच्या मताचा आदर करावा. त्यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देऊ नये. दरम्यान, जरी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले तरी हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा आठवले यांनी केला.