मुंबई: करोनाच्या लसीचे दोन डस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी संयमाचा अंत पाहू नका. दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, असा इशाराच प्रवीण दरेकर यांनी सरकारला दिला आहे.
प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी बोरिवली स्थानकाबाहेर जमून जोरदार घोषणा देत निदर्शने केली. यावेळी आंदोलकांकडून आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. ही निदर्शने करताना आंदोलक अधिकच आक्रमक झाले होते. आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे पोलीस आणि जीपीआर तैनात करण्यात आले होते. तसेच आंदोलकांनी रेल्वे स्थानकात घुसू नये म्हणून रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारात बॅरेकेटिंग करण्यात आले होते. खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, आमदार मनिषा चौधरी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांच्यासाठी रेल्वे प्रवास सुरू करा. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका. आम्ही पत्र लिहिले, पण त्याला सरकारने दाद दिली नाही. लोकांना कोविड काळात काम नाही. त्यांना मुंबईत कामासाठी येण्यासाठी रोज 700-800 रुपये खर्च येत आहे. कामावर नाही गेले तर नोकरी धोक्यात येत आहे. सर्व सामान्य माणसाने एवढा पैसा आणायचा कुठून? असा सवाल दरेकर यांनी केला.
मुख्यमंत्री अहंकारापोटी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे रेल्वे सुरू करण्याची मागणी करत आहेत. पण मुख्यमंत्री ऐकायला तयार नाहीत. हे अहंकारापोटी केलं जात आहे. हे सरकार निष्क्रिय आणि उदासीन आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.