मुंबई – आशिया करंडक तसेच ऑस्ट्रेलियात येत्या काळात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत नवोदितांना संधी देण्याच्या प्रयत्नात अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमीला डावलले जाऊ नये, असे मत माजी कसोटीपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या पाहता शमीची स्विंग गोलंदाजी जास्त प्रभावी ठरेल, असेही ते म्हणाले.
शमीने आयपीएल स्पर्धेत फलंदाजांना मदत करत असलेल्या खेळपट्टीवरही प्रभावी गोलंदाजी करून दाखवली आहे. त्याच्याकडे इन व आऊट हे दोन्ही स्विंग आहेत व त्याचा वापर त्याने सातत्याने खुबीने केला आहे. हीच त्याची खासियत ऑस्ट्रेलियात भारतीय संघासाठी सर्वात लाभदायक ठरेल. त्याच्याकडे वेगही आहे व अचूकताही आहे, त्यामुळेच त्याला जर या स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातून वगळले तर ते भारतासाठी मोठे नुकसान ठरेल, असेही मोरे यांनी सांगितले.
आशिया करंडक स्पर्धेतून प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. अशा स्थितीत शमी सर्वात जास्त महत्त्वाचा ठरेल. नवोदित गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत यात वाद नाही; परंतु त्यासाठी शमीचा बळी दिला जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.