शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया : जिल्ह्यात लोकप्रतिनिधींकडून नुकसानीची केवळ पाहणीच
रवींद्र कदम
नगर – गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातातून हिरावला गेला आहे. मात्र, लोकप्रतिनिधीकडून शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन केवळ पाहणी केली जात आहे. तसेच नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वसन दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याने नुसती पाहणी नको तर प्रत्यक्षात भरपाई द्या अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
सततच्या झालेल्या पावसामुळे खरिपांची पिके नेस्तनाबूत झाले असून उभ्या व सोंगूण पडलेल्या बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी पिकाला कोंब फुटले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामात सुरूवातीला पिकांसाठी हवाहवासा वाटणारा पाऊस मागील चार-पाच वर्षाच्या दुष्काळाची झीज नक्कीच भरून काढणार या आशेने शेतकऱ्यांनी पिकांवरील खर्चाला मोकळीक दिली होती. परंतु पिके काढणीच्या वेळी हाच जास्तीचा पाऊस पिकांसाठी घातक ठरला. बाजरी, मका, सोयाबीन काढणीच्या वेळी हा पाऊस थांबलाच नाही.
हाताशी आलेले पीक भिजल्याने मातीमोल झाले. 18 ऑक्टोबरपासून आजतागायत जिल्ह्यात कुठे न कुठे धो-धो पाऊस पडत आहे. त्यातच लोकप्रतिनिधी हे शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन केवळ पहाणी करून शेतकऱ्यांना अश्वासनच देत आहे. तसेच त्यांचे अतिउत्साही कार्यकर्ते फोटो सेशनेच करत आल्याने शेतकऱ्यामधून तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून प्रत्यक्ष भरपाई द्या केवळ पहाणी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका असे ही बोलले जात आहे.
शेतकरी दुहेरी संकटात
एक दोन वर्षापूर्वी दुष्काळाचे सावटाखाली उदरनिर्वाह केला. यंदा चांगला पाऊस होईल व शेतमालामधून चांगले उत्पन्न मिळेल व कर्जबाजारीपणामधून मुक्त होईल अशा आशेने मोठ्या प्रमाणात सोयाबीन, बाजरी, कांद्याची लागवड केली. मात्र ऐन सुगीला आलेले पीक सततच्या पावसाने पाण्यात सडून गेले. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत करावी.
सीताराम पटारे , प्रगतशिल शेतकरी, डोंगरगण
शेती करायची तरी कशी?
उच्च शिक्षण घेऊनही शेतीला पसंती दिली. बॅंकेचे कर्ज घेऊन पडीक शेती विकसित केली. मात्र, त्यावर्षी पावसाने दडी मारल्याने पीक आले नाही. तर दुसऱ्या वर्षी पिके जोमात आली. परंतु शेतमालाला हमी भाव मिळाला नाही. यंदा पिकेही जोमात आली. कंद्याला भरपूर भाव मिळत आहे. मात्र, झालेल्या पावसाने कांदा हा शेतातच सडून गेला आहे. त्यामुळे शेती करायची तरी कशी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
प्रशांत कदम , शेतकरी मांजरसुंबा
लोकप्रतिनिधींचे केवळ फोटो सेशन
गेल्या दोन-तीन दिवसांपासून लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केवळ पाहणी करून आश्वासन देत आहेत. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मात्र करत नाहीत. त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी रोख स्वरूपात मदत द्यावी. केवळ फोटो सेशन करून राजकीय पोळी भाजू नये.
भारत ससे, शेतकरी, वांबोरी