पुणे – जिल्ह्यातील एक हजार 230 महसुली गावांमध्ये “हर घर नल से जल’ ही योजना गेल्या वर्षापासून राबविण्यात येत आहे. यापैकी आतापर्यंत 132 गावांमध्ये हे काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांनी दिली. तसेच जिल्ह्यात 72 टक्के नळजोडणी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
देशात “हर घर नल से जल’ योजनेंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्ह्यात एक हजार 230 महसुली गावांसाठी 1957.89 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये एक हजार 845 महसुली गावे आहेत. त्यातील 500 गावे ही महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण विभागाकडे येतात तर उर्वरित एक हजार 354 गावे ही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाअंतर्गत येतात. त्यातील एक हजार 230 गावांमध्ये जल जीवन मिशनचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात नळजोडणी 72 टक्के पूर्ण
जिल्ह्यात 72 टक्के नळजोडणी पूर्ण झाली असून 8 लाख 93 हजार 862 पैकी 31 मार्चपर्यंत 6 लाख 39 हजार 932 घरांमध्ये नळजोडणी करण्यात आली आहे. तर 1 एप्रिलपर्यंत 21 हजार 857 जणांनी नळजोडणीसाठी नोंदणी केली आहे. दोन लाख 32 हजार 73 घरे अजूनही नळजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. उर्वरित कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध होणार असून ती कामेही लवकरच मार्गी लागतील असेही खताळ म्हणाले.