कराड – नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष संविधानामध्ये बदल करण्याची भाषा करतात. तरीही मोदी गप्प आहेत. या लोकांना संविधानसुद्धा धोक्यात आणायचे आहे. यातून तिसरी लोकसभा निवडणूक मोदींनी जिंकल्यास देशातील लोकशाही संपेल, त्यामुळे कोणी गोंडसपणे आश्वासने दिली तरी, त्यांच्या नादाला लागू नका, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पवारवाडी (नांदगाव, ता. कराड) येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील-चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, बंडानाना जगताप, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस पै. नानासाहेब पाटील, कराड दक्षिण सेवादल कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, जखिणवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र नांगरे-पाटील, सवादेचे उपसरपंच नितीन थोरात, दिग्विजय पाटील, अधिकराव जगताप, उदय पाटील, अश्विन चव्हाण, देवदास माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार चव्हाण म्हणाले, कराड दक्षिण मतदारसंघात काही ठराविक गावांना टॅंकर लागतो. त्यामध्ये पवारवाडीचे नाव पुढे असते. या गावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नदीतून पाणी योजना करणे व वनक्षेत्रातील पाझर तलावाचे पुनर्जीवन करण्याचे दोन उपाय आहेत. पहिला उपाय सुरू झाला आहे. यातून सोलर योजनेवरील पथदर्शी सुमारे 70 लाख रुपयांची पाणीयोजना पूर्ण होईल. पुढील कालावधीत पाझर तलावातील पाण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले, पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून कराड दक्षिणमधील 40 ते 42 पाणी योजना मार्गी लागल्या आहेत. परंतु, काही मंडळी या योजनांचे श्रेय घेत आहेत. या प्रतिगामी लोकांच्या विरोधकांचा भूलथापांचा खेळ ओळखावा. अजितराव पाटील म्हणाले, सध्या पक्षाच्या फुटीवरून सगळीकडे चर्चा आहे. पण, पक्षनिष्ठा काय असते हे विलासकाका आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून शिकावे.
यावेळी नांदगावचे माजी सरपंच टी.के. पाटील, प्रा. धनाजी काटकर यांची भाषणे झाली. प्रास्ताविक सागर कुंभार यांनी तर सूत्रसंचालन आकाश तडाखे यांनी केले. अधिकराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी पाणी योजनेच्या विहिरीस सयाजी शिंदे व शिवदास शिंदे यांनी जागा दिल्याबद्दल, तसेच ग्रामसेविका शोभा जाधव, शाखा अभियंता लक्ष्मण मंडले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संपत पवार, उपसरपंच विनायक पवार, संतोष पवार, हरिश्चंद्र पवार, रामचंद्र पवार, अशोक पवार, पांडुरंग पवार, रवींद्र येलवे, रवींद्र पवार, संजय खोत, जितेंद्र चव्हाण, चंद्रकांत पवार यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.