जामखेड – आवर्तनाची तारीख मी बदलली नाही तर पालकमंत्र्यांनी बदलली. ते तुमच्या पक्षाचे नेते आहेत, सरकार तुमचं आहे. प्रशासकीय अधिकारी देखील तुमच्याकडे आहेत. त्यामुळे उगाच तुमच्या अपयशाचे खापर माझ्यावर फोडू नका. याबरोबरच 15 तारखेला सुटणारे पाणी 21 ला सुटणार होतं पण ते आता आणखी उशिरा म्हणजे 25 तारखेला येतंय याला पूर्णपणे हे सरकार, सत्ताधारी नेते आणि भाजपचे लोक जबाबदार आहेत, असे रोखठोक प्रत्युत्तर आमदार रोहित पवार यांनी आ. राम शिंदे यांना दिले आहे.
कर्जत तालुक्यातील 54 गावांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्यातून यंदाचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे, याबाबत आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष, मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडण्यासंदर्भात समितीची बैठक बोलविण्याची विनंती केली होती.
या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री पाटील यांनी तत्काळ कालवा सल्लागार समितीची बैठक बोलवून उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत निर्णय घेतला होता. दि. 20 मे रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला असताना त्या तारखेला आवर्तन सोडण्यात आले नाही. त्यावरून आता मतदारसंघात चांगलेच राजकारण रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. आ. शिंदे यांनी कुकडीचे आवर्तन सुटले नसल्याने आ.रोहित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आ. पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.