प. बंगालमधील बिधानचंद्र रॉय या डॉक्टरांचा जन्म व मृत्यू एकाच तारखेला म्हणजे एक जुलै रोजी झाला. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीचा सन्मान म्हणून एक जुलै हा “डॉक्टर्स डे’ मानला जातो.
भारतीय समाजात उत्तम डॉक्टरांची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, शहरात राहून, भरपूर पैसा खर्च करून डॉक्टरी शिक्षण घेतल्यानंतर पैसा, उत्तम राहणीमान, मुलांचे दर्जेदार शिक्षण या सगळ्याकडे पाठ फिरवून जिथे गरज आहे, अशा खेड्यांमध्ये जाऊन वर्षानुवर्षे तिथल्या लोकांना उत्तम सेवा देणारे डॉक्टर कमीच!
डॉ. अलका कुलकर्णी या त्यापैकी एक आहेत. चाळीस वर्षांपूर्वी अलका अष्टपुत्रे केईएम हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मुंबईतील जी. एस. मेडिकल कॉलेजसारख्या मान्यवर कॉलेजमधून एमडी झाल्या बालआरोग्यतज्ज्ञ. याच काळात डॉक्टरी व्यवसायाच्या व्यापारीकरणास सुरुवात झालेली. याचा आपणही एक भाग व्हायचे नसेल तर दूर कुठेतरी, ज्या भागात दवाखाना नाही, अशा मागास गावात जाऊन गरीब लोकांना आपण आपले शिक्षण व ज्ञान देऊ करायचे, असे त्यांनी ठरवले.
सुदैवाने याच ध्येयाने झपाटलेले शशांक कुलकर्णी त्यांना भेटले. त्यांनी नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये एमएस केले होते. सर्जन. दोघांचे विचार जुळले आणि मग कोणत्या गावात जाऊन वैद्यकीय सेवा करावी याचा ते शोध घेऊ लागले. चाळीस वर्षांपूर्वी शहादा हा तालुका असला तरी तेव्हा ते अगदी अविकसित गाव होते. त्या भागात दवाखानाच नव्हता. लोकवस्ती जास्त करून आदिवासी लोकांची. असेच गाव यांना हवे होते. फक्त वीस हजार रुपये बरोबर घेऊन ते तिथे पोहोचले. ओळखीचे, नात्याचे असे त्यांचे कुणीही तिथे नव्हते.सुरुवातीला एक लहानशी जागा मिळाली. पुढे उकिरडा, मागे गोठा आणि शेजारी घोड्यांचा तबेला अशी ती जागा होती.
डॉक्टरांकडे जाण्याची सवय नसलेले हे गाव आताच्या नंदूरबार जिल्ह्यातले. उत्तरेला साठ किलोमीटरवर सातपुडा. एकंदरीत दुर्गम भाग. लोकवस्तीचा बराचसा भाग अशिक्षित व गरीब. डॉक्टरांकडे जायचे असते ही कल्पनाच मुळी नवीन. त्यात एखादी बाई डॉक्टर असू शकते ह्यावर विश्वास नाही. बहुतेकजण त्यांना नर्सबाई म्हणूनच ओळखायचे. अंगारेधुपारे, बुवा-बाबा, झाडपाल्याची औषधं सगळं करूनही मूल वाचत नाही म्हटल्यावर कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये आणलं जायचं. इथं ह्या दोघा डॉक्टरांची मुख्य अडचण म्हणजे हाताशी प्रशिक्षित स्टाफ नाही. कोणी मिळाले तरी आपले काम नोकरीसारखे नीटपणे निभवायचे असते ही संकल्पनाच ठाऊक नाही.
नको असलेल्या बाईला भुताली ठरवून तिला वाळीत टाकायचे हे तिथे अंगवळणी पडलेले. गावात आलेल्या दोन प्रामाणिक डॉक्टरांमुळे अनेकांचे हितसंबंध अडचणीत आले. मग डॉ. अलका कुलकर्णी ह्यांच्याबद्दल, त्यांचा मृत्यू झाला आहे व आता जे कुणी दिसते, ते त्यांचे भूत आहे अशा अफवा पसरायच्या. अशा अनेक अडचणींवर मात करीत कुलकर्णी दाम्पत्याने लोकांमध्ये जागृती निर्माण केली.
निरलसपणे सेवा करून लोकांमधे विश्वास निर्माण केला. तेथील अंधश्रद्धांमुळे अनेकदा कठीण प्रसंग येत. पण हे दोघेही हरले नाहीत, थांबले नाहीत. झगडत, लढत राहिले. चिकाटीने, शांतपणे आपले काम करीत राहिले. या मागास भागातील कुटुंबातील स्त्रियांच्या जीवाला काही किंमत नसे. अर्धमेल्या अवस्थेतील मुलाला ऍडमिट करण्याची आत्यंतिक गरज असताना, मोफत उपचार करण्याची तयारी दाखवूनही रोजगार बुडेल, नवऱ्याची जेवण्याची गैरसोय होईल म्हणून आई तिच्या मुलाला घरी घेऊन जाई; तेव्हा या डॉक्टरना काय मनस्ताप होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. अंधश्रद्धेमुळे सख्खे नातेवाईक रक्त देण्यास नकार देत, तेव्हा अलकाताईंनी स्वतः रक्तदान करून पेशंटला वाचवलेले आहे आणि त्याहीपुढची मजा म्हणजे दुसऱ्या एका पेशंटचा रक्तगट वेगळा असल्याने त्यांनी त्याला रक्त दिले नाही म्हणून तो त्यांच्यावरच रुसला!
हळूहळू गावातील प्रेमळ, सुशिक्षित लोकांशी त्यांची मैत्री झाली. तिथल्या हौशी लोकांनी एकत्र येऊन नाट्यसंस्था स्थापन केली. अनेक वर्षे नाटकांच्या स्पर्धा भरवल्या. सध्याच्या महामारीच्या काळात काही डॉक्टरांनी अश्राप जनतेकडून कोविड झाल्याचे सांगून 50 हजार ते एक लाख रुपये बिल वसूल केलेले त्यांना पहावे लागते.
त्या म्हणतात, सलाईन, ऑक्सिजन, औषधे अशा सर्व उपचारप्रणालीचे मिळून 6,750 रुपये डॉक्टरांनी घ्यावेत, असे सरकारने ठरवून दिले आहे. दुर्दैवाने एखाद्या कुटुंबातील एखाद्दुसरा यात दगावला आणि त्यांच्याच कुटुंबातला आणखी एखादा पेशंट आला तर आम्हाला त्याच्याकडून पैसे घ्यावेसेच वाटत नाहीत. आपल्या शिक्षणाशी, व्यवसायाशी इतकी बांधिलकी असणाऱ्या डॉक्टर्सना देवदूत म्हणू नये तर काय म्हणावे?
-माधुरी तळवलकर