सरपंच दत्ता गांजाळे यांचा आरोप
मंचर-मंचर आणि परिसरातील खासगी डॉक्टरकडून डेंग्यू रुग्णांना वैद्यकीय तपासणीत घाबरवून आर्थिक लूट करण्यात येत आहे. त्यामुळे मंचर शहरात काही नवोदित डॉक्टरांच्या विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने वेळीच संबंधित डॉक्टरांना आवर घालावी, अन्यथा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी दि. 25 पासून उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा सरपंच दत्ता गांजाळे यांनी शुक्रवारी (दि. 20) दिला आहे.
मंचर शहर आणि परिसरातील काही नवोदित डॉक्टर वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली रुग्णांना लुटण्याचा प्रकार सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर मंचर (ता. आंबेगाव) येथे सरपंच दत्ता गांजाळे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी युवराज बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, सुनील बाणखेले, वसंतराव बाणखेले, प्रविण मोरडे, जे. के. थोरात, बाजीराव मोरडे, लक्ष्मण थोरात, कल्पेश बाणखेले, अरुण बाणखेले, नवनाथ थोरात, संदीप जुन्नरे, शिवाजी राजगुरु, सुशांत थोरात, खालिद इनामदार, सविता खरमाळे, संगीता बाणखेले, कविता थोरात, रंगनाथ थोरात, सचिन मोरडे यावेळी उपस्थित होते.
आजाराच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या भरमसाट बिलामुळे रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्ण हवालदिल झाले आहेत. डेंग्यू आजाराच्या नावाखाली सरासरी 20 ते 40 हजार रुपये घेतले जातात.
सध्या डॉक्टरांकडून रॅपिड डेंग्यू तपासणी कीट सर्रास वापरले जाते. ज्या कीटवर केंद्र व अनेक राज्य सरकारची ते कीटचा रिझल्ट विश्वसनीय नाही. म्हणून वापरण्यावर आणि विक्रीवर बंदी घातलेली आहे. त्या औषधांचा वापर सुरु असल्याचे सरपंच दत्ता गांजाळे म्हणाले. डेंग्यू झालेल्या रुग्णांची नोंद सरकारी यंत्रणेत उपजिल्हा रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी करणे डॉक्टरांना बंधनकारक आहे, तरीसुद्धा त्याची नोंद केली जात नाही. डेंग्यू रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करुन अनेक प्रकारचे बिल आकारले जाते. सदर रॅपिड डेंग्यू तपासणी कीटची खरेदी किंमत कमी असुन रुग्णांकडून एक हजार सहाशे रुपये आकारले जातात.
परिसरातील काही डॉक्टर पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासण्या न करता खासगी सहाय्यक ठेऊन कुठलीही शासकीय परवानगी न घेता अनाधिकृतपणे हॉस्पिटलमध्येच तपासण्या करुन त्याचा रिपोर्ट स्वतःच्या लेटरहेडवर लिहून देतात. रुग्णांना जेनेरिक औषधे जी कमी किमतीची बाजारात उपलब्ध आहे. अशी औषणे वापरली जात नाही.रुग्ण बरा झाल्यास डिसचार्ज देण्याच्या वेळेस पैसे कमी पडल्यास रुग्णांना एक प्रकारे नजरकैदेत ठेवण्याचा प्रकार घडल्याचेही सरपंच गांजाळे यांनी सांगितले.
- उपजिल्हा रुग्णालये व्हेंटिलेटरवर
मंचर येथील उपजिल्हा रुग्णालये संपुर्णपणे व्हेंटिलेटरवर आहेत. तेथे मागील काही महिन्यापासून रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. रूग्णांना तेथे दाखल करून न घेता यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल पुणे तसेच ससुन हॉस्पिटल पुणे आणि खासगी डॉक्टरांकडे पाठविले जाते. सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यास तेथे सुख सुविधा दिल्या जात नाहीत. रुग्णांकडे नीट लक्ष दिले जात नाही. - नागरिकांचा विश्वास उडाला-
उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेरील कचराकुंडीमध्ये शवविच्छेदना दरम्यान निघालेले काही अवयव सापडतात. सदर उपजिल्हा रुग्णालय येथून तपासणीसाठी रुग्णांना बाहेर पाठविले जाते. तेथे रुग्णांच्या नातेवाईकांना रूग्णांना भेटून दिले जात नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयावरील नागरिकांचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळे रुग्णांना इच्छा नसतानाही खासगी डॉक्टरांकडे जावे लागते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार सरपंच दत्ता गांजाळे यांनी यावेळी सांगितले.