मुंबई : देशातील विविध बॅंकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्या याने आता आपल्या परदेशी मालमत्तेवर कारवाई न करण्याची मागणी केली आहे. देशात जप्त करण्यात आलेल्या मल्ल्याच्या संपत्तीमधून देणीदारांचे देणी आपण देवू शकतो त्यामुळे परदेशी मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येवू नये असे मल्ल्या याने म्हटले आहे. यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात त्याने एक याचिका दाखल करत ही विनंती केली आहे. परंतु, ईडीने त्याच्या या मागणी फेटाळूल लावली आहे.
भारतातील मल्ल्याची कोट्यवधींची संपत्ती ईडीने यापुर्वीच जप्त केली आहे. दरम्यान त्याच्यावर देशातल्या बॅंकांचे नऊशे कोटींचे कर्ज आहे. त्यातच आता मल्ल्याने ईडीने भारतातून त्याची जेवढी संपत्ती जप्त केली आहे त्यातून आपल्या देणीदारांची देणी दिली जाऊ शकतात त्यामुळे आपल्या परदेशातील कोणत्याही संपत्तीवर कारवाई करू नका अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. तर दुसरीकडे ईडीने जप्त केलेल्या संपत्तीतून देणीदारांची देणी दिली जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल असल्याने त्याला कारवाईला सामोरे जावेच लागणार असल्याचेही ईडीने स्पष्ट केले आहे.