भुवनेश्वर : जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिरात उद्यापासून तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंदीरातील स्वच्छता जपून ठेवण्यासाठी मंदीर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आताएखादा भाविक किंवा मंदिराचा कर्मचारी तंबाखू, गुटखा किंवा विड्याचे पान खाताना आढळल्यास त्याला मंदिरात परिसरात प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर 500 रुपयांचा दंडही केला जाईल.
मंदिरात स्वच्छता राखण्यासाठी श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला असून 1 ऑगस्टपासून हा नवा नियम लागू होणार आहे. असे मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक पी.के. मोहपात्रा यांनी सांगितले. स्वच्छतेच्या नवीन नियमाबाबत लोकांना माहिती देण्यासाठी मंदिर प्रशासन मंदिराभोवती फलक लावणार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारांवर तैनात रक्षक भाविकांची आणि मंदिर कर्मचाऱ्यांची तपासणी करतील. ज्यांच्याकडे पान, तंखाखू वा गुटखा आढळल्यास त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराची डागडुजी आणि रथयात्रेदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर, तसेच दैनंदिन पूजा-विधी सुरळीत पार पाडण्यासाठीच्या उपाययोजनांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.