जीवनगाणे
अरुण गोखले
भगवान महावीरांचा एक दिव्य असा जीवनसंदेश आहे. ते शिकवतात की, तुम्ही जीवनात कोणत्याही गोष्टीचा इन्कार करू नका. म्हणजे काय? तर जीवनात जो आणि जसा क्षण तुमच्या समोर येईल तो स्वीकारा. ती परिस्थिती, ती घटना, ती गोष्ट नाकारू नका, तर त्याचे हसत स्वागत करा.
माणसाचे काय आहे की, त्याला जीवनात सुख, आनंद, लाभ, धनदौलत, मानसन्मान हे अगदी लगेच हवे असते. त्यांचा स्वीकार करायला तो अगदी एका पायावर आणि अर्ध्या रात्रीतही तयार असतो. पण तेच जीवनात येणार दु:ख, अपयश, तोटा, हानी ही मात्र त्याला कल्पनेतही नको असते. वास्तविक जीवनाकडे जर आपण साक्षीत्वाने, द्रष्टेपणाने पाहात गेलो तर असे नक्कीच लक्षात येईल की इथले सारेच क्षणाक्षणाला बदलत असते.
ज्याप्रमाणे निसर्गात रात्रही कायम राहात नाही, पानगळही कायम घडत नाही, ओहोटी सदैवच राहात नाही. तर रात्री मागून दिवस येतो, अंधारामागून प्रकाश येतो, निराशेमागून आशेचा किरण उगवतो हे सारे इथे घडतच असते. पण आपले मानवी मन हे या गोष्टी स्वीकारायला तयार नसते. ते छोट्याशा नुकसानीने, हानीने, पराभवाने, अपयशाने खचून जाते. हे असे खचून जाणे किंवा या गोष्टीच्या भीतीपोटी त्यापासून पळून जाणे ही बाब साधू, संत, महात्मे ह्यांना मान्य नाही. ते जीवाला खऱ्या अर्थाने जागवीत असतात. त्याला सांगत, शिकवत असतात की बाबारे! तू तुझ्या वाट्याला आलेले सुखदु:खाचे, यशापयशाचे, लाभहानीचे, वियोग आणि मिलनाचे क्षण हे साक्षीत्वाने पाहा. त्यांना धीराने, खंबीरपणाने सामोरे जा. तू तुझ्या प्रयत्नात कमी पडू नकोस.
जीवनात जी परिस्थिती समोर येईल तिला धैर्याने तोंड दे. संकटांशी मुकाबला कर. वाट्याला आलेल्या अपयशातून काहीतरी शिक, कळत नकळत हातून घडलेल्या चुका या प्रयत्नपूर्वक सुधार, दुरुस्त कर, परिस्थितीवर मात कर, स्वप्रयत्नांनी ती बदलायची जिद्द बाळग, खचून जाऊ नकोस.
जीवनाकडे पाठ फिरवणे, आत्महत्येचा विचार करणे, भरल्या प्रपंच्यातून कर्तव्याकडे पाठ फिरवून पळपुटेपणाने निघून जाणे हे बरोबर नाही. निराशेच्या विचारांना मनात जराही थारा देऊ नकोस. तुझे मनोबल, क्षमता, कौशल्य सारे पणाला लाव आणि परिस्थितीवर मात कर. जीवन हे नाकारण्यात नाही तर, ते आहे तसे स्वीकारण्यात आणि जगण्यात खरा पुरुषार्थ आहे.