पूर्व हवेलीतील ऊस उत्पादकांचा सूर
कारखाना अडगळीत गेल्याने शेतकरी अडचणीत
उरुळी कांचन – थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करणार, अशी वल्गना सर्व राजकीय पुढाऱ्यांनी केली होती. मात्र, यशवंत कारखाना सुरू करण्यात आता कोणत्याच पक्षाला स्वारस्य नसल्याचे उघड झाले आहे. आजपर्यंत कारखान्या संदर्भात देण्यात आलेली आश्वासने आणि घोषणा हवेत विरली आहेत. यशवंतच्या शेतकरी सभासदांचा आता कोणत्याही राजकीय पक्ष, नेत्यावर विश्वासच राहीला नसल्याने कारखान्याच्या नावावर मतं मागू नका, असा सूर आता निघू लागला आहे.
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन विक्री प्रक्रिया ग्राहक मिळत नसल्याने खोळबंली असल्याचे सुरवातीला सांगिलते जात होते. त्यानंतर याच संदर्भात विविध निर्णय घेण्यात येऊनही कारखाना अद्यापही सुरू झालेला नाही. या-ना त्या कारणाने हा प्रश्न दिवसेंदिवस लांबणीवर पडत गेला आहे. एकीकडे यशवंत कारखान्याचे धुराडे पेटण्याचे नाव घेत नाही तर दुसरीकडे पूर्व हवेलीतील उसाला कोणताही कारखाना विचार नाही. कारण, हवेलीच्या भागातून कारखान्यापर्यंत उसाची वाहतूक परवडत नसल्याचे अन्य कारखान्याच्या संचालक मंडळाचे म्हणणे आहे. यातून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातही आता यशवंतच्या परिसरातील ऊस नेण्यास कुट्टीचालक व गुऱ्हाळचालकही टाळाटाळ करू लागल्याने यंदा पूर्व हवेलीच्या पट्ट्यात उसाचे क्षेत्रही कमी होत आहे. या कारणामुळे पूर्व हवेलीतील शेतकरी मेटाकुटीला झाला आहे.
यशवंत कारखाना सुरू करण्याच्या प्रक्रियेत कुठं घोडं अडतंय, हे न सुटणारे कोडे असून राजकीय पटलावर काही हालचाली होत असल्या तरी यामध्ये काहीना काही खोडा घातला जात आहे. त्यातच याकामी सरकारची नेमकी भूमिका काय? हे ही स्पष्ट होत नसल्याने यातील नेमके गौडबंगाल काये, हे कोणालाही समजेनासे झाले आहे. सुमारे 20 ते 22 हजार शेतकरी सभासद व एक हजार कामगारांच्या कुटुंबांच्या चुलीशी निगडित असलेला यशवंत साखर कारखाना आता अखेरच्या घटका मोजत आहे. कोणत्याही पक्षाच्या राजकीय लोकप्रतिनिधींना याचे सोयरसुतक नसून, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी फक्त यशवंतचा राजकीय सोयीनुसार तालुक्यातील पुढारीचा वापर करुन मतं मिळवण्याचे काम करीत आहेत. सभासद शेतकऱ्यांची निवडणुकीपुरती केवळ आश्वासनांवरच बोळवण केली जात आहे. यामुळेच या विधानसभेला यशवंत कारखान्याबाबत कोण काय बोलणार आणि कारखाना केव्हा चालू होणार, याकडे शेतकरी सभासदांसह कामगारांचे लक्ष लागले आहे.