मयूर सोनवणे
सातारा – भाजप- शिवसेना युतीमध्ये वाई विधानसभा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेकडे राहिला आहे. त्यामुळे आता युती झाल्यास शिवसेना कोणाला उमेदवारी देणार की नुकतेच भाजपवासी झालेले माजी आमदार मदन भोसले हे नरेंद्र पाटलांप्रमाणे शिवसेनेत जाऊन विधानसभा निवडणूक लढणार, असा पेच राजकीय गोटात चर्चिला जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाईतून विधानसभेची निवडणूक भाजपचे मदन भोसले हेच लढवतील, असे स्पष्ट केले आहे. तर काल खंडाळा येथील कार्यक्रमात वाई विधानसभा मतदारसंघातून शिवसेना निवडणूक लढविणारच असल्याचा पवित्रा मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. शिवसेना व भाजप दोघांनी स्वतंत्र उमेदवार दिल्यास शिवसेनेची उमेदवारी वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी गुणकारीच ठरु शकते असे मानले जात आहे.
वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तीन तालुक्यांचा विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. बोपेगावचे पाटील घराणे आणि भुईंजचे भोसले घराणे ही दोन घराणीच प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे यापैकी कोणी अन्य तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलाच तर त्याचा फायदा या दोघांपैकीच कोणा एकाला आजवर झालेला आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये माजी आमदार तथा किसन वीर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यांना मकरंद पाटील यांच्याकडून पराभूत व्हावे लागले आहे.
या दोन्ही निवडणुकांमध्ये मदन भोसले यांचा ढासळलेला जनसंपर्क आणि कारखान्यावर वाढलेल्या कर्जाची चर्चा तसेच कामगारांचे थकलेले पगार आणि शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिले या मुद्द्यांवर राष्ट्रवादीने प्रचारात चांगलेच रान तापवून मतदारांचा कौल आपल्या पारड्यात पाडून घेतला. मात्र, आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून कारखान्याला प्रचाराचे मुख्य हत्यार बनवून उगारले तरी कितपत फायदा होणार, हे मात्र काळच ठरवणार आहे.
कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी आजवर कॉंग्रेस विचारांवर पुढे आलेल्या भोसलेंनी कॉंग्रेस विचारांना मुठमाती देऊन उगवत्याला वंदन आणि मावळत्याला निरोप असे म्हणत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केवळ प्रवेशावर न थांबता मदन भोसले यांनी आणखी आक्रमक होत मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत, याशिवाय आजवर कारखाना कधीही अडचणीत नव्हता, तसेच कर्ज झाले म्हणून कारखान्याचे अस्तित्व संपलेले नाही तर कारखान्याचा उभ्या देशात गवगवा आहे, हे स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मदन भोसले यांचे दावेही भाजपप्रवेशानंतर चांगलेच जड झाले असून राष्ट्रवादीच्या पोटातही गोळा आला आहे. मात्र आता वाई विधानसभा निवडणूक लढविणारच असा ठार निधार्र शिवसेनेनेही केला असल्याने शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव यांचीच उमेदवारी ग्राह्य धरली जाऊ लागली आहे.
पुरुषोत्तम जाधव यांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकल्यास मदन भोसले यांच्या वाट्याच्याच मतांचे विभाजन होणार असून याचा फायदा निश्चितच राष्ट्रवादीला म्हणजे मकरंद पाटलांना होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी राष्ट्रवादीसाठी गुणकारी ठरणार असल्याचे मानले जात असले तरी वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघावर भगवा फडकणार की कमळ फुलणार का पुन्हा घड्याळाची टिकटिक वाजणार हे आगामी काळ आणि मतदारच ठरवतील हे मात्र नक्की.