जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांना घेराव; प्रश्नांचा भडिमार करत ठिय्या
सातारा – प्रहार अपंग क्रांती आंदोलन आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने सुमारे चारशे दिव्यांगांनी आज जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण अधिकाऱ्यांना घेराव घातल्याने जिल्हा परिषदेत काही वेळ गोंधळ झाला होता.
केंद्र सरकारच्या दिव्यांग हक्क कायदा 2006 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य शासनाने धोरण आखले आहे, तरीही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. दिव्यांगांच्या कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने जिल्हा परिषदेवर धडक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार चारशे दिव्यांग आज सकाळी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर जमा झाले. त्यांनी आपल्या मागण्यांचे फलक झळकवत घोषणाबाजी केली.
आंदोलक थेट समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसले. त्यावेळी बाहेरही गर्दी झाल्याने बराच वेळ गोंधळ उडाला. समाजकल्याण अधिकारी हरेश्वर डोंगरे यांना आंदोलकांनी धारेवर धरत ठिय्या मारला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे संजय भागवत अन्य अधिकाऱ्यांसमवेत तेथे आले. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. लेखी आश्वासन दिल्याशिवाय बाहेर जाणार नाही, असा इशारा दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.