उत्पन्नावर पाणी : चालक अपुरे असल्याचा दावा
प्रवासी वाहतुकीतून मात्र “जादा’ फायदा
पुणे – राष्ट्रीय परिवहन महमंडळाची “महाकार्गो’ (मालवाहतूक) सेवा मागील काही दिवसांपासून बंद आहे. नागरिक दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात साहित्यांची वाहतूक करतात. पण, ऐन उत्सव काळात मालवाहतूक बंद ठेवल्याने प्रवाशांना खासगी पर्यायाकडे वळावे लागले. त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला एसटीला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.
यंदाच्या दिवाळीत पुणे विभागातील 13 आगारांतून सुमारे 6 हजार एसटी प्रवाशांच्या सेवेत होत्या. यातील 3 हजार 500 बस नियमित संचलनात होत्या. तर दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाच्या पुणे विभागातून 2,500 अधिक बस सोडण्यात आल्या होत्या. दि. 19 ते 28 ऑक्टोबरदरम्यान पुणे विभागातून राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत अधिकच्या बस सोडण्यात आल्या होत्या. यातून एसटी महामंडळाला 1 कोटी 45 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मागील दोन वर्षे करोनामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी सेवा ठप्प होती. पण यावर्षी एसटीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मागील काही वर्षांतील हे सर्वाधिक उत्पन्न असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार कार्गोसेवा सुरू आहे. नागरिकांनी यावर्षी सुरक्षित प्रवाशाला प्राधान्य देत जास्तीत जास्त संख्येने एसटीने प्रवास केला आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रवाशांना चांगली सेवा देता आली आहे. मागील काही वर्षांत प्रथमच दिवाळीत एसटीचे उत्पन्न वाढले आहे.
– ज्ञानेश्वर रणावरे, वाहतूक व्यवस्थापक, एसटी पुणे विभाग