मुंबई – बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन दिव्या अग्रवालने चांगलाच गाजवला. यात तिने सर्व स्पर्धकांना तगडी टक्कर देत विजेतेपदाचा मान मिळवला. मात्र विजेती झाल्यानंतरही दिव्याने बिग बॉसबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉस ओटीटी जिंकल्यानंतर दिव्या बिग बॉसमध्ये दिसणार अशी अपेक्षा होती पण तसं होऊ शकलं नाही. तिला बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी कोणताही फोन आला नसल्याचे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिव्याला टीव्ही शो बिग बॉसमध्ये न बोलवल्याने अनेकजण तिला चिडवत होते. याबाबत तिने सांगितले की, “बिग बॉसवरून लोकांनी माझा अपमान केला, ते चिडवत असायचे की तू आली नाहीस, तुला बोलावलं नाही. त्यावेळी काय बोलावं तेच समजत नव्हतं कारण माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी इंडस्ट्रीमध्ये बाहेरची व्यक्ती आहे, त्यामुळे क्रिएटर्स आणि मेकर्सनी मला या सीझनसाठी का बोलावलं नाही याची मला कल्पना नाही. पूर्वी लोक माझी चेष्टा करायचे तेव्हा मला खूप वाईट वाटत होते.”
यावेळी तिने टीव्ही आणि OTT यांच्यातील फरक समजून सांगण्या प्रयत्न केला. “मला आशा होती की, आम्ही ओटीटी सीझनमधून नंतर टीव्हीवर जाऊ. आम्हाला OTT लहान किंवा कमी आहे असं वाटायचं. होस्ट वेगळे होते. सीझन कमी वेळाचा होता, घर देखील लहान होते, स्पर्धक देखील इतके मोठे नव्हते. OTT म्हणजे काय, हे मुख्य शो सारखेच आहे पण लोकल लेव्हल प्लॅटफॉर्म आहे. टीव्ही हा बाप आणि ओटीटी हा मुलगा आहे असं आम्हालाही वाटत असे. पण मी ठरवलं होतं की, लोकांनी ओटीटीला लहान म्हटलं तरी मी त्याचे मूल्य कधीही कमी होऊ देणार नाही.”
पुढे ती म्हणाली, “सध्या मला आनंद आहे की फायनल ओटीटीचा दुसरा सीझन आला आहे आणि तो स्वतः सलमान खान होस्ट करत आहे. अनेक दिग्गज स्पर्धक आहेत. पूजा भट्ट हे बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात मोठं नाव आहे. आता हे आश्चर्यकारक झाले आहे की मुख्य शोच्या होस्टला OTT वर यावे लागेल. यापेक्षा मोठा बदल काय असू शकतो?”