नवी दिल्ली – प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायामूर्तींनी एका घटस्फोटाच्या प्रकरणावर सुनावणी करताना केली आहे. भारतात लग्नसंस्थेला फार महत्त्व आहे. एका दाम्पत्यामध्ये सुरू असलेल्या वादाशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली आहे.
या सुनावणीदरम्यान दाम्पत्याने प्रेमविवाह असल्याचे न्यायालयात सांगितले. यावेळी न्यायामूर्ती भूषण गवाई म्हणाले, प्रेमविवाह केलेल्यांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाद सुरू असलेल्या दाम्पत्याला ध्यान किंवा मेडिटेशन करण्याचा सल्ला न्यायालयाने दिला होता. परंतु, याला पतीने विरोध केला होता. या दाम्पत्यांना विवाह टिकविण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही न्यायालयाने दिला होता. परंतु, या दाम्पत्यांना घटस्फोटच हवा होता. यामुळे न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.
या घटस्फोटात न्यायालयाने मध्यस्थी करण्याचा पर्याय सुचविला होता. परंतु, पतीला न्यायालयाचा हा पर्याय मान्य नव्हता. यापूर्वी न्यायालयाने एका निकालाच्या पृष्ठभूमीवर पतीच्या परवागनीशिवाय घटस्फोट दिला जाऊ शकतो, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.