पुणे -करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरू ठेवण्याच्या दृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकारी यांनी उद्योजकांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात
अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची व्यवस्था करावी, त्यादृष्टीने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
मुख्यमंत्री यांनी नुकतीच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. करोनाच्या दोन लाटेमधील हा काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊन आपण काहीप्रमाणात आर्थिक व्यवहार सुरु करत असलो तरी अतिशय सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे.
उद्योग आणि आर्थिक चळवळ सुरु राहण्यासाठी कामगारांचे येणे जाणे हे त्यांच्या कामाचे ठिकाण आणि घर इथपर्यंतच मर्यादित राहणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. करोनाची दुसरी लाट पूर्ण ओसरलेली नाही.
परंतु, याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे काही आर्थिक उपक्रम सुरु करत आहोत. हे करतांना सावधगिरीची पाऊले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते काटेकोरपणे अंमलात येतील याची दक्षता घेण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या आहेत.