नगर – जिल्हा बॅक ही कारखानादारापुरती मर्यादित न ठेवता केंद्र व राज्य सरकारच्या तसेच संचालक मंडळाने घेतलेले सर्व निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केल्यामुळे जिल्हा बॅंकेची ओळख ही शेतकऱ्यांची बॅंक म्हणून झाली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. जिल्हा बॅकेच्या माध्यमातून गाई-म्हशींसाठी खेळते भांडवल म्हणून आगडगाव, रतडगाव, देवगावमधील शेतकऱ्यांना कर्जरुपी चेकचे वाटप करण्यात आले, यावेळी कर्डिले बोलत होते.
यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, संचालक विलास शिंदे, रेवन चोभे, बबन आव्हाड, तुकाराम वाघुले, सरपंच मच्छिंद्र कराळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, पूर्वी बॅंकेला होणाऱ्या नफ्यातून कारखान्यांसाठी कर्ज वाटप करायचे. मात्र, मी संचालक झाल्यापासून या गोष्टीला विरोध करीत जिराईत भागातील शेतकऱ्यांसाठी दूध व्यवसायासाठी कर्ज देण्याचे काम केले.
जिल्ह्यातील एकही शेतकरी खरीप व रब्बी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही. आमदार नसलो तरी बॅंकेचे निर्णय लोकांपर्यंत घेऊन गेलो. नगर तालुक्यातील जिल्हा बॅकेच्या माध्यमातून खेळते भांडवल म्हणून 90 कोटी रुपयांची कर्ज प्रकरणे मंजूर केली आहे. लवकरच पुढील काळात 2000 कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना लाभ होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बॅंकेचा उपयोग केला जाईल. यावेळी अभिलाष घिगे, मच्छिंद्र कराळे यांनी मनोगत व्यक्त केले.