सातारा, (प्रतिनिधी) : खेड ग्रामपंचायत हद्दीतील मुलकी पड असलेल्या शासकीय जमीनीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल 15 कुटुंबांनी विना परवाना रहिवासी आणि वाणिज्य कारणास्तव मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते.
दि.26 मार्च पर्यंत ते अतिक्रमण तत्काळ काढून घेण्याबाबत महसूल विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आदेशाचा अल्टिमेटिम संपल्यानंतर काल रात्री तात्काळ मोहीम ठरली गेली. त्यानुसार एकूण 16 घरांवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 6 घरांवर बुलडोजर फिरवला आहे, तर दत्ता जाधवचे घर पाडण्याचे काम सुरू आहे. पुढे युवराज जाधवचे टोलेजंग बांधकामही पाडण्यात येणार आहे.
प्रशासनाने मोठे बंदोबस्त ठेवले असून कोणालाही याठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पहाटे साडेपाच पासून ही कारवाई अत्यंत गुप्तता पाळून करण्यात येत आहे. तहसिलदार नागेश गायकवाड यांनी काढलेल्या नोटीसा मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील यांनी समक्ष देऊनही प्रतापसिंह नगरातील गुन्हेगारी कुटुंबांनी अतिक्रमण काढून घेतले नाही.
त्यामुळे महसूल विभागामार्फत आज सकाळी पाच वाजल्यापासून बुलडोझर लावून हे अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. खेड ग्रामपंचायत हद्दीतील 259 गुंठे मुलकी पड क्षेत्रात काही कुटुंबांना 10 बाय 10 एवढीच जागा रहिवासी कारणास्तव दिली गेली होती.
येथील गट नंबर 70 मधील खेड ग्रामपंचायत हद्दीतील मुलकी पड शासकीय जमीनीवर अनेकांनी रहिवासी आणि वाणिज्य कारणास्तव मोठ्या प्रमाणावर कच्ची, पक्की बांधकामे केली आहेत. यात ग्रामपंचायतीने काही अटीशर्तीवर दिलेल्या या जागेत प्रत्येकाने सोईस्कर विनापरवाना बांधकामे केली आहेत.
यात सातत्याने गुन्हेगारी कारवाया करत मारहाण, लुटालूट, गंभीर गुन्हे करणार्यांच्या कुटुंबांनी तर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करत शासकीय जमीन बळकावली आहे. तसा गटविकास अधिकारी यांचा अहवाल, तर मंडल अधिकारी, तलाठी यांच्या स्थळ पाहणी अहवालानंतर या कुटुंबांना अतिक्रमण काढून घेण्याचे महसूल विभागाने फर्मान काढले होते.
यावरूनच मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 50 अधिनियमाचे उल्लंघन केलेल्या तब्बल 16 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांना दि.21 मार्च रोजी तहसिलदारांनी काढलेल्या नोटीसा मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील यांनी प्रत्येकाला देऊन केलेले अतिक्रमण दि. 26 मार्च पर्यंत काढून घेण्याचा इशारा दिला होता.
तरीदेखील स्थानिकांकडून कडून स्वतःहून अतिक्रमणे काढण्यात आली नाहीत. नोटीसा मिळाल्यावर एकानेही अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेमार्फत हे अतिक्रमण काढण्याची मोहीम आज पहाटेपासूनच उघडण्यात आली आहे. यासाठी होणारा खर्च संबंधित कुटुंबाकडून वसूल केला जाणार आहे. यावेळी काही आपत्कालीन परिस्थिती, नुकसान झाले तर या सर्व कुटुंबांना सर्वस्वी जबाबदार धरणार असल्याचा इशारा तहसिलदार नागेश गायकवाड यांनी नोटीसीद्वारे दिला होता.
त्यामुळे घटनास्थळावर कोणीही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. शेकडोच्या संख्येने पोलीस फौजफाटा व पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख व महसूल विभाग, नगरपालिका चे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी फौजफाटा घेवून आज पहाटेपासूनच याठिकाणी उपस्थित आहेत.
त्यामुळे गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी उत्तर प्रदेश पॅटर्न सारखा प्रतापसिंह नगरातील अतिक्रमण काढण्यासाठी बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. महसूल विभाग सकाळपासूनच ऍक्शन मोडमध्ये आला आहे. या कारवाईमुळे खेड, कृष्णानगर, संगमनगर सह सातारकरांनी नगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन करीत आभार मानले आहेत.