वाघोली (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी 688 गरजूंना दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था व इतर यांच्या मदतीने किराणा साहित्याचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली असून या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. काकडे यांनी दोन हजार नागरिकांना मोफत मास्क चे देखील वाटप केले आहे.
याशिवाय थेऊर येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी नुकतीच केली . या कक्षाची पाहणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी करून काकडे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे नुकत्याच झालेल्या काकडे आणि तरवडे या विवाह सोहळ्यात शासनाच्या अटी व नियमांचे तंतोतंत पालन करून विवाह सोहळा संपन्न करून उपस्थितांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण केली आहे.
सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना तसेच सभासदांना शासनाचे नियम व अटींचे तंतोतंत पालन करून गोर गरीब गरजूंना मदत करण्याचे आवाहन काकडे यांनी केले आहे. त्यानुसार राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असल्याचे काकडे यांनी सांगितले आहे.