पुणे – कोरोनानंतर अत्यंत हालाखित गुजराण करणाऱ्या दिव्यांगांच्या कुटुंबांना हातभार लाभावा म्हणून ‘अवनी’ हि सामाजिक संस्था पुढे आली असून दिव्यांगांना धान्य किट आणि मायेची उब देणारी ब्लैंकेट वाटप करत अवनी या सामाजिक संस्थेने दिव्यरत्नांची सेवा केली. यावेळी दिव्यांग अन्न सुरक्षा विमा योजनेअंतर्गत सत्तर दिव्यांगांना धान्य किट आणि ब्लैंकेटचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने सुरू केलेली दिव्यांग अन्न सुरक्षा विमा योजनेचा शुभारंभ नुकताच झाला होता. या उपक्रमात सहभागी असलेल्या ‘अवनी’ या सामाजिक संस्थेने दुसऱ्या टप्प्यात धान्य किट वाटपासाठी पुढाकार घेतला. कामयानी दिव्यांग शाळेत ध्यानगुरू श्री रघुनाथ येमुल गुरूजी आणि प्राध्यापिका डॉ. निवेदिता एकबोटे, कामयानी संस्थेच्या कार्यकारी अधिकारी श्रीलेखा कुलकर्णी, उद्योजक रमेश पाटील यांच्या हस्ते सत्तर दिव्यांगांना धान्य किट वाटप करण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीनंतर दिव्यांग, वृध्द, निराधारांची उपासमार होवू नये, त्यांना दोन वेळचं जेवण मिळालेच पाहिजे या उद्देशाने डिकाईचे संस्थापक येमूल गुरूजी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग अन्न सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची गरज आणि जाणिव समाजातील दानशूरांना, समाजिक संस्था, उद्योजक आणि सरकारला व्हावी या उद्देशाने शंभर दिव्यांगांना दरमहा वर्षभर धान्य वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
दिव्यांग कुटुंबांचे मनौधर्य वाढवणारी अन्न सुरक्षा विमा योजनेत सरकार आणि सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे असे अवाहन या निमित्ताने करण्यात आले होते. अवनी या सामाजिक संस्थेने या अवाहनाला प्रतिसाद दिला आणि धान्य वाटप आणि ब्लैंकेट वाटप केले.