कोल्हापूर – अवनि व एकटी संस्थेच्यावतीने कोल्हापूर शहर प्लास्टिक मुक्त व्हावे, तसेच कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण होण्यासाठी कचरा व्यवस्थापन व्हावे, यासाठी पुढाकार घेऊन ‘प्लास्टिक मुक्त कोल्हापूर’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.
याची सुरुवात राजारामपुरीतून होणार आहे. सोमवारी (दि. १५) ‘प्लास्टिक मुक्त राजारामपुरी’ या अभियानाची सुरुवात महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते उद्घाटनाने होत आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अवनि व एकटी संस्था ही महानगरपालिकेच्या मदतीने शहरातील ओला व सुका कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे काम करत आहे. शहरातील भाजीपाला मार्केट मधील ओल्या कचऱ्याचे व व्यावसायिक आस्थापनाचा सुका कचरा संकलन, वर्गीकरण व पुनर्वापर केला जातो. तसेच दोन प्रभागाच्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचे काम संस्था करत आहे.
या अनुभवातून व पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असा प्लास्टिक कचरा वर्गीकरण करणे व त्याचा पुनर्वापर करणे, यासाठी संस्था काम करत आहे. हे सर्व काम कचरावेचक महिलांना सोबत घेऊन व त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी त्यांना रोजगार निर्मितीसाठी केले जात आहे. त्यातून कचरावेचक महिलांच्या मुलांना शिक्षण व कचरावेचकांना आर्थिक सक्षम बनविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
संपूर्ण शहर प्लास्टिक मुक्त व्हावे, यासाठी संस्था काम करत आहे. सध्या संस्था राजारामपुरी भागातील व्यावसायिक आस्थापनांचा सुका कचरा संकलन करते. यातून वर्गीकरण करून प्लास्टिक शिरोली नाका येथील प्लास्टिक श्रेडींग युनिट येथे पुनर्वापरासाठी कटिंग केले जाते. पुढे ते महापालिका रस्त्याच्या कामात वापरते.
त्यामुळे सध्या निरुपयोगी प्लास्टिक मोठ्या प्रमाणात पुनर्वापरात येत आहे. गेल्या वर्षभरात असे एक टनाहून अधिक प्लास्टिक वापरण्यात आले आहे. राजारामपुरी भागातील व्यावसायिक अस्थापानांसोबत रहिवाशी भागाचाही सुका कचरा संकलन करून तो पुनर्वापरात आणण्याच्यादृष्टीने संस्था काम करणार आहे. या कामात राजारामपुरी भागातील सामाजिक संस्था व कार्यकर्ते, पर्यावरणवादी संस्था, संघटना, कार्यकर्ते तसेच सुज्ञ नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांनी शिस्त लावून घेणे गरजेचे आहे. ओला व सुका कचरा घरातच वर्गीकरण करावा, फक्त ओला कचरा महापालिकेच्या घंटागाडी किंवा टिपरमध्ये द्यावा. सुका कचरा एकत्रित करून ठेवल्यास तो एकटी संस्थेच्या परिसर विकास भगिनी (कचरा वेचक भगिनी) कडे द्यावा. आपला कचरा, आपली जबाबदारी या भावनेतून सर्वांनी कचऱ्याच्या वर्गीकरणाचे महत्व ओळखल्यास शहरातून कोंडाळे व डम्पिंग ग्राउंड हद्दपार होऊ शकतात. त्यासाठी इच्छाशक्ती व नागरिकांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष संजय पाटील, सेक्रेटरी प्रा.डॉ. अर्चना जगतकर, दुर्गेश लिंग्रस, Adv. बाबा इंदुलकर, डॉ. सुरज पवार, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रुपाली बाड आदी उपस्थित होते.