विजेच्या तारेवर बसलेले दोन पक्षी. रंग-रूप-आकारानं जरा वेगळेच दिसले. स्थलांतरित असावेत का? यापूर्वी कधीच दिसले नव्हते… की आपणच घरात असून नसल्यासारखे असल्यामुळे आपलं लक्ष कधी गेलं नव्हतं? बऱ्याच दिवसांनी कॅमेरा (मोबाइलचा नव्हे) बाहेर काढला आणि फोटो घेतला. झूम करताना जाणवलं, दोघांमध्ये बरोबर एक मीटरचं अंतर आहे. थोडं हसू आलं. वाटलं, ज्या तारेवर आपण बसलोय, त्यातून वीज खेळतीय याचंही भान नसलेल्या या पाखरांनासुद्धा सोशल डिस्टन्सिंग कसं बरोब्बर कळलं..!
सकाळचं कोवळं ऊन अंगावर घेणाऱ्या त्या पाखरांचा फोटो घरातल्यांना दाखवू लागलो, तेवढ्यात टीव्हीकडे लक्ष गेलं. विरारजवळ सात कामगारांना टेम्पोनं चिरडल्याची बातमी! पाचजण जागीच ठार झाले. मुंबई-अहमदाबाद हायवेवर पहाटे साडेतीनच्या सुमारास घडलेली ही घटना. कोण, कुठले हे कामगार? अशा उत्तररात्री हायवेवरून पायी कुठं निघाले होते? कशासाठी? मग कळलं, असे शेकडो कामगार हायवेवरून अखंड चालतायत. हातावरचं पोट असलेली ही कष्टाळू माणसं. लॉकडाउनमुळे पोटावर पाय येऊ लागल्यावर त्यांचे पाय गावाकडे वळले. मूळचे गुजरातमधले. मुंबईहून चक्क पायी निघाले होते गावी! सृष्टीची विविधता पाहण्यासाठी अन्य देशी आलेली ही माणसं नव्हेत. कच्च्याबच्च्यांना घास भरवता यावा म्हणून पडेल ते काम करायला आलेला हा मजूरवर्ग. संसर्ग होवो, उपासमार होवो किंवा असा अपघात… भाळी मृत्यूच लिहिलेला!
किती अंतर आहे आपल्यात आणि यांच्यात! “सोशल’ डिस्टन्स! आपल्याला घराजवळ घास मिळाला. वर्क फ्रॉम होम सुरू झालं आणि घासच घरात आला. बॅंकेच्या खात्यात आरटीजीएसनं जमा होणारा मेहनताना म्हणजे घास भरवल्याचं फीलिंग! पण आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना, अशा अवस्थेत सापडलेल्या या हजारो-लाखो कष्टकऱ्यांचं काय? महामारी आली; लोक मरतायत, हे आपल्याला कळण्यासाठी खूप माध्यमं आहेत. पण यांना कधी आणि कसं कळलं असेल? कळल्यावर त्यांची काय अवस्था झाली असेल? आपलं गाव, आपलं घर अधिक सुरक्षित वाटलं तेव्हा ते निघाले… पण किती जण गावी पोहोचले? जे पोहोचले त्यांचं काय झालं? स्वागत तर निश्चित झालं नाही.
“कशाला आलात,’ म्हणून गाव भांडलं त्यांच्याशी. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी गावचे रस्ते रोखले. औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका गावात शहरातून आलेल्या कुटुंबाला बेदम मारहाण झाली. अनेक गावांमध्ये शिवीगाळ करण्याचे प्रसंग घडले… का? अंतर राखलं नाही म्हणून! हे सगळं आठवून एक लक्षात आलं… अंतर “राखणं’ जमत नसलं तरी अंतर “पडलंय’ हे निश्चित! एक सूक्ष्मजीव आपल्याला एकमेकांपासून दूर ढकलतोय… जवळिकीचं महत्त्व समजावं म्हणून!
त्या दोन पाखरांचा फोटो पुन्हा पाहिला. आता तो खूपच वेगळा भासू लागला. कदाचित देशीच असतील पक्षी; पण आता स्थलांतरित वाटू लागले… त्या कामगारांसारखे! आणि त्यांच्यातलं एक मीटरचं अंतर आता शेकडो-हजारो किलोमीटरचं वाटू लागलं. आपल्यात खरंच खूप अंतर पडलंय. विशेष म्हणजे, त्याची जाणीवसुद्धा आपल्याला राहिलेली नव्हती. आज मात्र नोकरी-धंद्यासाठी परदेशी गेलेले, तिथं अडकून पडलेले हजारो भारतीय आपल्याला आठवतायत. कशी का होईना, ही जाणीव होणं गरजेचं होतं!
अबाऊट टर्न : हिमांशू